राज्य सरकारने जाहीर केलेल्या या भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांच्या केवायसी तपशीलात त्रुटी आढळल्यामुळे त्यांना अजून पात्र ठरविण्यात आलेले नाही. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, “केवायसी न झाल्यास मदत थेट खात्यात जमा करता येणार नाही,” असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यात निधी वितरण अडचणीत
पुणे जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानुसार राज्य सरकारने जिल्ह्यासाठी २६ कोटी २२ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मात्र, मदतनिधी वाटपाची प्रक्रिया केवायसीअभावी रखडली आहे.
जिल्ह्यातील एकूण ४७,४२४ मंजूर लाभार्थ्यांपैकी ४०,९८६ शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. पण त्यापैकी तब्बल ३०,०८९ शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे मदतनिधी जमा करण्यात अडथळे येत आहेत.
जिल्हा प्रशासनाने सांगितले की, “शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय शासनाकडून मंजूर झालेली मदत खात्यात वर्ग करता येणार नाही. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ जवळच्या सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.”
अवकाळी पावसाने झालेले नुकसान गंभीर
एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, भाजीपाला आणि उन्हाळी भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तसेच मका आणि ज्वारीसारखी पिकेही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईसाठी मागणी केली होती. त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानाचा आढावा घेऊन भरपाई मंजूर केली.
शासनाचे आवाहन
शासनाने स्पष्ट केले आहे की, भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची केवायसी नोंदणी अद्ययावत असणे आवश्यक आहे. बँक खात्याशी जोडलेले मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक आणि नावामध्ये त्रुटी असल्यास लाभ मंजूर होणार नाही.