जालना : लग्न असो किंवा साखरपुडा किंवा अन्य कोणता कार्यक्रम, त्यासाठी फुलांची आवश्यकता असतेच. सध्या तर लग्नसराईचा काळ सुरू आहे. नुकताच गुढीपाडवा आणि रमजान ईद सारखी सण होऊन गेलेत. परंतु अशा काळातही फुलांचे दर गडगडले आहेत. रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या दरात काहीशी तेजी पाहायला मिळाली मात्र, ही दोन्ही उत्सव संपताच फुलांचे दर गडगडले असून गलांड्याला केवळ 10 रुपये प्रति किलो एवढा निम्न दर मिळतोय.
advertisement
जालना शहरातील फुल बाजारामध्ये जिल्ह्यातील आसपासच्या परिसरातील खेडेगावातील शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फुले घेऊन येत असतात. यामध्ये गुलाब, मोगरा, शेवंती, गुलछडी, जरबेरा, गलांडा, झेंडू इत्यादी प्रकारची फुले बाजारात येतात. गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या दिवशी यांच्या दरात काहीशी तेजी पाहायला मिळाली. मात्र, हे दोन्ही सण संपताच फुलांचे दर घसरले आहेत. गलांडा केवळ 10 रुपये प्रति किलो विक्री होत आहे. तर गुलाबाला 80 ते 100 रुपये प्रति किलो एवढा दर मिळत आहे. मोगऱ्याला 200 ते 250 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. जरबेरा 30 ते 40 रुपये प्रति किलो, झेंडू 30 रुपये प्रति किलो, बिजली या फुलाला 70 ते 80 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळत आहे.
उन्हाळ्यात चविष्ट आणि झडपट रेसिपी हवीये? मग लगेच ट्राय करा विदर्भस्टाईल कळणा!
रमजान ईद आणि गुढीपाडवा या दिवशी दरात तेजी पाहायला मिळाली. त्या दिवशी गुलाब 200 ते 300 रुपये प्रति किलो तर गलांडा देखील 30 ते 40 रुपये प्रति किलो या दराने विक्री झाला. मोगऱ्याला 400 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला. परंतु हे दोन्ही सण संपताच आता दर कोसळले आहेत.
आगामी काळात रामनवमी, आंबेडकर जयंती आणि लग्नसराई आहे त्यामुळे फुलांचे दर निश्चितच वाढतील. त्यातल्या त्यात जालना जिल्ह्यात पाण्याची कमतरता असल्याने फुलांची आवक देखील कमी होणार आहे. त्यामुळे आगामी काळात सुधारणा होईल, अशी शक्यता व्यापारी सूर्यप्रकाश इंगळे यांनी व्यक्त केली.





