या मदतीचा लाभ सप्टेंबर महिन्यात पावसामुळे बाधित झालेल्या पिकांना मिळणार आहे. सरकारने ठरवलेल्या नियमांनुसार, प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त २ हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.
अतिवृष्टीमुळे व्यापक नुकसान
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांतील शेतीचे मोठे नुकसान केले. सुमारे ६८ लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याची नोंद शासनाच्या अहवालात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले होते की, शेतकऱ्यांना अटी-शर्तींशिवाय मदत देण्यात येईल आणि एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी) च्या निकषांपेक्षा जास्त मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल.
advertisement
निकष काय असणार?
शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की, मदत एनडीआरएफच्या मार्च २०२३ मध्ये निश्चित केलेल्या निकषांनुसारच दिली जाईल आणि २ हेक्टरच्या मर्यादेतच राहील.
थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा
शासन निर्णयानुसार, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून ही रक्कम थेट जमा केली जाईल. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (Farmer ID) आहे, त्यांच्या खात्यात मदत आपोआप जमा होईल. मात्र, ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही, त्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.
या माध्यमातून पारदर्शकतेने मदत वाटप होईल आणि शेतकऱ्यांना कार्यालयीन प्रक्रियेत त्रास न होता थेट लाभ मिळेल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
सरकारचा दिलासा, शेतकऱ्यांसाठी आधार
या निर्णयामुळे पावसाने बाधित झालेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. सरकारचा दावा आहे की, ही मदत जलदगतीने वितरित करण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासनांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.