मुंबई : राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी दिली जाणारी मदत आता तीन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या वाढीव एक हेक्टर क्षेत्रासाठी ६४८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
advertisement
मंत्री पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत ८,१३९ कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. एकूण सहा लाख ५६ हजार ३१०.८३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेल्या सहा लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांना शेती पुन्हा उभी करण्यास मदत होईल.
विभागनिहाय कसं वाटप होणार?
छत्रपती संभाजीनगर विभाग
या विभागातील बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतील तीन लाख ५८ हजार ६१२ शेतकऱ्यांना एकूण ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये तीन लाख ८८ हजार १०१.१३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान समाविष्ट आहे.
नागपूर विभाग
नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील ३,९३१ शेतकऱ्यांना ७ कोटी ५१ लाख ७५ हजार रुपये मदत मिळणार आहे. या विभागातील ७,६९८.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे नोंदवले गेले आहे.
नाशिक विभाग
नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांतील ५३ हजार ८६५ शेतकऱ्यांना ५९ कोटी ३६ लाख १३ हजार रुपये मिळणार आहेत. एकूण ५० हजार ६२९ हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली गेली होती.
अमरावती विभाग
अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतील एक लाख ७ हजार ६१५ शेतकऱ्यांना घर कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या विभागात एक लाख ३९ हजार ४३८.२३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
पुणे विभाग
सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ८८ हजार १४३ शेतकऱ्यांना १०३ कोटी ३७ लाख २० हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. या भागात ७० हजार ४९८.८९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे शासनाच्या अहवालात नमूद आहे.
कोकण विभाग
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील ११ शेतकऱ्यांना एकूण २ लाख १६ हजार रुपये मदत देण्यात आली आहे. या विभागातील २५.३३ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले होते.