कापूस पिकामध्ये वातावरणीय बदलांमुळे बोंड आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. या आळीमुळे कापसाच्या बोंडांची हानी होत असून उत्पादनात लक्षणीय घट होते. या समस्येवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्पिनोसायड 45% SC, इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG, तसेच क्लोरंट्रानिलीप्रोल 18.5% SC यांसारख्या औषधांची फवारणी केल्यास आळीवर नियंत्रण मिळवता येते. यासोबतच गोमूत्रावर आधारित जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यास पिकांचे संरक्षण अधिक नैसर्गिक पद्धतीने करता येऊ शकते.
advertisement
Navratri 2025 : दर्शनदूत! वयोवृद्धांना घडवतात देवीचे दर्शन, 4 वर्षांपासून करतात काम, Video
उडीद आणि मूग या डाळीच्या पिकांवर लाल्या रोगाचा धोका वातावरणीय बदलामुळे वाढला आहे. या रोगामुळे पानांवर लालसर ठिपके पडतात आणि पिकाची वाढ खुंटते. लाल्या रोगावर नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% WP किंवा कार्बेन्डाझिम 50% WP यांची फवारणी करणे उपयुक्त ठरते. त्यासोबतच सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीतील पोषणतत्वांची उपलब्धता वाढून पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
सोयाबीन पिकामध्ये वातावरणीय बदलामुळे टिक्का रोग ही मोठी समस्या ठरत आहे. या रोगामुळे पानांवर काळसर डाग पडतात. पाने अकाली गळतात आणि झाडांची वाढ देखील थांबते. यावर नियंत्रणासाठी हेक्साकोनाझोल 5% EC, टेब्युकोनाझोल 25% EC, किंवा प्रोपीकोनाझोल 25% EC यांसारख्या बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच कीड नियंत्रणासाठी थायमेथॉक्साम 25% WG किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% SL फवारल्यास पिकांचे रक्षण करता येते. गोमूत्र फवारणीमुळे पानावरील डाग कमी होऊन पिकांची तजेला वाढते, असे अनुभव शेतकऱ्यांनी घेतले आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते वातावरणीय बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिक व्यवस्थापन पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. योग्य वेळी कीडनाशक आणि रोगनाशकांचा वापर, पिकांचे फेरपालट, तसेच हवामानाशी सुसंगत अशा वाणांची निवड ही काळाची गरज आहे. यासोबतच सेंद्रिय खतांचा वापर आणि गोमूत्र फवारणीसारख्या नैसर्गिक पद्धतींना प्रोत्साहन दिल्यास रासायनिक औषधांवरील अवलंबित्व कमी होऊन पिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.