यंदा शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविण्याकडे दुर्लक्ष केले असून, केवळ दोन लाख शेतकऱ्यांनी चार लाख 31 हजार 855 अर्ज भरून पिके संरक्षित केली आहेत. यंदा एक रुपयांतील पीक विमा योजना सरकारने गुंडाळली असून, योजनेतील निकषातही बदल केले आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडेच पाठ फिरविली आहे. गतवर्षी जवळपास 4 लाख शेतकऱ्यांनी नऊ लाखांवर अर्ज भरून पिके संरक्षित केली होती. चालू वर्षात मात्र आजवर 2 लाख 2 हजार 985 शेतकऱ्यांनी चार लाख 31 हजार 855 अर्ज भरून पिके संरक्षित केली आहेत.
advertisement
Mosambi Market: मोसंबी उत्पादकांना दुहेरी दिलासा, आडत असोसिएशनच्या निर्णयाने खिशात खेळणार पैसा
नुकसान भरपाईसाठी असलेली चार ट्रिगर कमी करून सरकारने केवळ एकाच ट्रिगर अंतर्गत भरपाई देण्याचा समावेश नवीन योजनेत केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी न झाल्यास, पीक उभे असताना आलेल्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास, पीक कापणीनंतर शेतामध्ये पिकाचे नुकसान झाल्यानंतर मिळणारी भरपाई असे तीन ट्रिगर बंद केले असून केवळ एकच म्हणजे शेतकऱ्याला अंतिम उत्पन्न किती मिळाले यांतर्गतच भरपाई मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
31 जुलै 2025 ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकांचा पीक विमा भरून घ्यावा. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर उत्पादनात घट झाल्यास पात्र शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले आहे.