अमेरिका-इराण युद्धामुळे काय महागलं? काय स्वस्त झालं?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Iran America War : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे.
मुंबई : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. विशेषतः इराणमधून होणारी आयात ठप्प झाल्याने सुका मेव्याचे दर झपाट्याने वाढले आहेत, तर दुसरीकडे निर्यात खंडित झाल्यामुळे बासमती तांदळाच्या किमतीत घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही आर्थिक फटका बसत आहे.
पिस्ता आणि बदामाचे दर गगनाला
इराणमधून मोठ्या प्रमाणात आयात होणारा पिस्ता सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी १,६५० रुपये प्रति किलो दराने मिळणारा इराणी पिस्ता आता थेट २,४०० रुपयांवर पोहोचला आहे. आयात पूर्णपणे थांबल्याने बाजारात उपलब्धता कमी झाली आणि दरात मोठी उसळी आली.
आरोग्यासाठी लाभदायक मानला जाणारा मामरा बदामही महागाईच्या लाटेत सापडला आहे. १,८०० रुपयांवरून थेट २,८०० रुपये प्रति किलोपर्यंत त्याची किंमत पोहोचली आहे. म्हणजेच जवळपास ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या मते, साठा कमी होत चालल्याने पुढील काही आठवड्यांत दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
जर्दाळूला सर्वाधिक फटका
सुका मेव्यात सर्वाधिक वाढ जर्दाळूमध्ये नोंदवली गेली आहे. ७५० रुपयांवर मिळणारा जर्दाळू आता १,४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जवळपास ८५ टक्के वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे जर्दाळू जवळपास दुप्पट महागला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
बासमती तांदूळ स्वस्त
दुसरीकडे, इराण हा भारतीय बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार मानला जातो. सध्या तेथे निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारात तांदळाचा साठा वाढला आहे. परिणामी ७,१०० रुपये प्रति क्विंटल असलेला दर घसरून ५,९०० रुपयांवर आला आहे. सुमारे १६ टक्क्यांची घसरण झाल्याने व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
advertisement
दुबईत ३७० कंटेनर अडकले
या परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रातील निर्यातदारांवरही झाला आहे. जालना, मुंबई, नाशिक आणि नागपूर येथून दुबईकडे जाणारी कांदा, मका, मिरची, टोमॅटो आणि डाळिंबाची निर्यात सध्या ठप्प झाली आहे. सुमारे ३७० कंटेनर मालासह दुबईमध्ये अडकून पडले आहेत. दुबईस्थित New STS Trading Company चे संचालक सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले की, आर्थिक संकट तीव्र होत असून सरकारच्या तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे.
advertisement
शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता
निर्यात थांबल्यामुळे शेतमालाचे दर घसरत आहेत, तर आयात बंद झाल्याने सुका मेवा महागतो आहे.अशी दुहेरी कोंडी निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास बाजारातील अस्थिरता आणखी वाढू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 8:25 AM IST









