मुंबई : केंद्र सरकारने कृषी उपकरणांवरील जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा आज निर्णय २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होत असून, शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. उच्च दर्जाची उपकरणे परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाल्यामुळे शेतीचे आधुनिकीकरण वेग घेईल. विशेषतः लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.
advertisement
प्रगत साधनांकडे वाटचाल
आतापर्यंत महागड्या उपकरणांच्या किंमतींमुळे अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा इतर प्रगत साधने खरेदी करणे अवघड जात होते. मात्र जीएसटी दरकपातीमुळे हे चित्र बदलणार आहे. ट्रॅक्टरसारख्या आवश्यक साधनांवर आता मोठा खर्च न करता खरेदी शक्य होईल. यामुळे शेतीत कार्यक्षमता वाढेल आणि उत्पादनक्षमता सुधारणार आहे.
ट्रॅक्टरच्या किमतीत थेट बचत
या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम ट्रॅक्टरच्या किमतींवर झाला आहे. विविध अश्वशक्ती (Horsepower) असलेल्या ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांना हजारोंचा दिलासा मिळणार आहे.
३५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टर : आधी किंमत ६,५०,००० रुपये होती. आता ती घटून ६,०९,००० रुपये झाली आहे. म्हणजेच जवळपास ४१,००० रुपयांची बचत.
४५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टर : आधी किंमत ७,२०,००० रुपये होती, आता ती ६,७५,००० रुपये झाली आहे. म्हणजेच थेट ४५,००० रुपयांचा फायदा.
५० अश्वशक्तीचा ट्रॅक्टर : पूर्वी किंमत ८,५०,००० रुपये होती, आता ती ७,९७,००० रुपये झाली आहे. म्हणजेच ५३,००० रुपयांचा दिलासा.
७५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टर : आधी किंमत १०,००,००० रुपये होती, आता ती घटून ९,३७,००० रुपये झाली आहे. म्हणजेच तब्बल ६३,००० रुपयांची बचत.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
तज्ज्ञांच्या मते, ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणांच्या किमतीत झालेली ही घसरण ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मजुरीचा खर्च वाचेल. पेरणी, नांगरणी, कापणी यांसारखी कामे वेगाने व अधिक कार्यक्षमतेने पूर्ण होतील. यामुळे उत्पादनक्षमता वाढेल आणि पिकांचा दर्जाही सुधारेल.
नवे प्रयोग आणि तांत्रिक प्रगती
कमी दरात उपलब्ध होणाऱ्या उपकरणांमुळे शेतकरी नवे प्रयोग करण्यास पुढे येतील. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून कमी वेळात अधिक उत्पादन घेणे शक्य होईल. सरकारच्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्रात तांत्रिक प्रगतीला गती मिळेल आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
उच्च महागाई आणि उत्पादन खर्च वाढत असलेल्या काळात जीएसटी दरकपात हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. उत्पादन खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुलभ होईल. त्याचबरोबर जास्त उत्पादनातून त्यांचे उत्पन्नही वाढेल.
एकंदरीत, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणांच्या किमती कमी होणे हा शेतकऱ्यांसाठी नवा श्वास ठरणार आहे. उत्पादन खर्च कमी करून शेती नफ्याची होईल आणि भारतीय कृषी क्षेत्र आधुनिकीकरणाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करेल.