धाराशिव - मराठवाड्यातील दुष्काळ हा सर्वश्रुत आहे. त्यामुळे मराठवाडा आणि दुष्काळ एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकरी हे दुष्काळावर मात करीत आपापल्या परीने यशस्वी शेती करत आहेत. आज अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
ईश्वर देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथील ईश्वर देशमुख यांच्याकडे 6 एकर शेती आहे. त्यातील केवळ 2 एकर क्षेत्र बागायती होते. उर्वरित क्षेत्र कोरडवाहू असल्याने त्यातून फारसे उत्पन्न हाती लागत नव्हते. त्यांच्या शेतात स्टोन क्रेशरसाठी अनेक वर्षांपूर्वी खड्डा खोदण्यात आला होता.
advertisement
खोदण्यात आलेल्या या खड्ड्यात पावसाचे पाणी साचायचे आणी साचलेल्या या पाण्याचा सदुपयोग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या साडेपाच एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून उसाची लागवड केली. जानेवारीनंतर शेतातील बोअरवेल कोरडा पडतो, तेव्हा या खड्ड्यातील पाण्याचा ते ऊस पिकासाठी वापर करतात.
याठिकाणी ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते. इतकेच नाही तर पावसाळ्यात असलेले पाणी हे ते पुढच्या पावसाळ्यापर्यंत वापरतात. खडकात खड्डे असल्याने पाणी पाझरत नाही त्यामुळे खड्ड्यातील पाणी त्यांना ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात शेतीला वापरता येते.
रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई, बीडचा शेतकऱ्यानं नेमकं काय केलं?, VIDEO
आता त्यांच्याकडे साडेपाच एकर ऊस व काही फळझाडे देखील आहेत. तर एकरी 60 टनापर्यंत उसाचे उत्पन्न घेणारे शेतकरी म्हणून देखील ते परिसरात परिचित झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आहे, त्या गोष्टींचा सदुपयोग करता आला तर नक्कीच बदल करता येतो, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.