हप्ता कधी येणार?
माध्यमांच्या अहवालानुसार, केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसानचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते. यासंदर्भात अधिकृत घोषणा बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारमधील निवडणुका ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे या काळात हप्ता वितरणाबाबत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
advertisement
आचारसंहितेदरम्यान हप्ता मिळणार का?
सध्या बिहारमध्ये निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, या काळात पीएम किसानचा हप्ता जमा होईल का? त्याचं उत्तर असं आहे की, आचारसंहितेदरम्यान नवीन योजना सुरू करता येत नाही, परंतु पूर्वीपासून मंजूर असलेल्या योजनांतील निधी वितरणावर बंदी नाही. त्यामुळे पीएम किसानसारख्या सातत्याने चालणाऱ्या योजनांअंतर्गत पैसे देणे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे.
काही राज्यांमध्ये आधीच पैसे वितरित
केंद्र सरकारने काही राज्यांमध्ये २१व्या हप्त्याचे पैसे आधीच वितरित केले आहेत.विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत देण्यात आली आहे. २६ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाल्याची घोषणा केली. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर मधील लाभार्थ्यांनाही पैसे देण्यात आले आहेत. आता पुढील टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातसह उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांना निधी वितरित करण्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान, दिवाळीपूर्वी हप्ता मिळावा अशी लाखो शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, आता सरकारने नोव्हेंबरमध्ये हप्ता जमा करण्याचे संकेत दिल्यामुळे शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.