या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यावर्षी या योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. देशभरातील लाखो शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दिवाळीनंतर २१ वा हप्ता येणार
मागील काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की, सरकार दिवाळीपूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून किंवा कृषी विभागाकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच दिवाळी जवळ आल्याने आता या कालावधीत हप्ता येण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
advertisement
तज्ञांच्या मते, आता २१ वा हप्ता दिवाळीनंतरच जमा होण्याची दाट शक्यता आहे. विभागाकडून लवकरच याबाबत अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाऊ शकते, ज्यामध्ये हप्त्याच्या तारखेची माहिती दिली जाईल.
काही शेतकऱ्यांचे हप्ते थांबू शकतात
सरकारकडून वेळोवेळी अशा शेतकऱ्यांची तपासणी केली जाते ज्यांनी अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेतला आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज रद्द केले जातात, तसेच पूर्वी मिळालेल्या रकमेची वसुली देखील केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पात्रतेबाबत पूर्ण खात्री करूनच योजना सुरू ठेवावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
ई-केवायसी आणि जमीन पडताळणी आवश्यक
पंतप्रधान किसान योजनेतील लाभ घेण्यासाठी दोन गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे. जसे की, ई-केवायसी पूर्ण करणे, जमीन पडताळणी (Land Verification) करणे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी ही दोन्ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो किंवा विलंबाने मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर या प्रक्रिया पूर्ण कराव्यात, जेणेकरून पुढील हप्ता त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होईल.