पीएम किसान योजना म्हणजे काय?
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी 2,000 रु) डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या देशभरात 10 कोटींपेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
advertisement
21 वा हप्ता कधी येईल?
सरकारी सूत्रांनुसार, 21 वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला दिवाळीपूर्वी पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र आता असे मानले जाते की बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी (6 नोव्हेंबरपासून सुरू) हप्ता वितरित होईल. तरीही, केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख अद्याप घोषित केलेली नाही.
केंद्रीय कृषीमंत्री काय म्हणाले?
कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपये जमा केले जातील. त्यांनी सर्व राज्यांना ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन नोंदींची पडताळणी त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी अपूर्ण आहेत, त्यांनाही लवकरच लाभ मिळू शकेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
काही राज्यांमध्ये हप्ता आधीच वितरित
काही राज्यांमध्ये हा हप्ता आधीच शेतकऱ्यांना मिळाला आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली. तसेच, 7 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील 8.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹171 कोटी रुपये हस्तांतरित झाले. त्यामुळे उर्वरित राज्यांना आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निधी मिळण्याची अपेक्षा आहे.
या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही
ई-केवायसी पूर्ण नाही, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही
बँक खात्याचे तपशील चुकीचे किंवा अपूर्ण आहेत
राज्य सरकारांना पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून यादी केंद्राला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निवडणूक आचारसंहिता आणि हप्ता वितरण
सध्या बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे नवीन योजना लागू करता येणार नाहीत. मात्र, पीएम-किसानसारख्या सुरू असलेल्या योजनांचे हप्ते देण्यावर निर्बंध नाहीत. त्यामुळे सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यास, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रु जमा होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
जर तुमचे ई-केवायसी आधार लिंकिंग किंवा बँक खाते तपशील अद्ययावत नसतील, तर ते तात्काळ पूर्ण करा. यामुळे तुम्हाला 21 व्या हप्त्याचा लाभ वेळेवर मिळेल. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत पाठवण्याची पूर्ण तयारी आहे.
