मुंबई : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दर चार महिन्यांनी थेट बँक खात्यात जमा होणारे 2,000 रुपये अनेक शेतकऱ्यांसाठी शेतीच्या दैनंदिन खर्चाचा कणा ठरतात. खते, बियाणे, औषधे, सिंचन तसेच इतर आवश्यक बाबींसाठी ही रक्कम उपयोगी पडते. त्यामुळेच आता पीएम-किसान योजनेच्या 22 व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
advertisement
22 वा हप्ता कधी जमा होणार?
सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पुढील हप्ता नेमका कधी जमा होणार? केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी आतापर्यंतच्या पद्धतीनुसार हा हप्ता फेब्रुवारी 2026 च्या आसपास वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारणतः दर चार महिन्यांनी हप्ते दिले जात असल्याने जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते, असा अंदाज आहे.
मात्र, यावेळी शेतकऱ्यांमध्ये थोडीशी चिंता दिसून येत आहे. कारण पीएम-किसान योजनेत काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. पूर्वी केवळ ई-केवायसी पूर्ण असणे पुरेसे मानले जात होते, पण आता सरकारने शेतकरी आयडी (Farmer ID) अनिवार्य केल्याचे स्पष्ट केले आहे. ज्यांच्याकडे हा युनिक शेतकरी ओळख क्रमांक नसेल, अशा लाभार्थ्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो.
फार्मर आयडी का महत्वाचा?
फार्मर आयडीमागील उद्देश काय आहे, याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचावा, यासाठी ही प्रणाली राबवली जात आहे. खोटी नावे, दुहेरी नोंदणी, चुकीची माहिती किंवा अपात्र लाभार्थी यांना रोखण्यासाठी शेतकरी आयडी उपयुक्त ठरणार आहे. या आयडीमुळे शेतकऱ्यांची जमीन, शेतीविषयक तपशील आणि वैयक्तिक माहिती एकाच डिजिटल प्रणालीशी जोडली जाणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
अन्यथा हप्ता मिळणार नाही
याशिवाय, ई-केवायसी ही अट आधीपासूनच लागू आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांना 22 वा हप्ता मिळणार नाही. ही प्रक्रिया मोबाईलवरून किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत सहज करता येते, तरीही अनेक शेतकरी ती वेळेवर पूर्ण करत नाहीत, हे चित्र आहे.
काही वेळा हप्ता थांबण्यामागे इतर तांत्रिक कारणेही असतात. आधार क्रमांक आणि बँक खात्यातील माहिती जुळत नसणे, बँक खाते बंद असणे, आयएफएससी कोड बदललेला असणे किंवा बँक केवायसी अपडेट नसणे यामुळेही निधी अडकू शकतो. तसेच जमिनीच्या नोंदींमधील त्रुटी असल्यास प्रणाली शेतकऱ्याला अपात्र ठरवू शकते.
दरम्यान, आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी शेतकरी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडून लाभार्थी यादी पाहता येते.
