पालघर : देशातील महत्त्वाकांक्षी आणि वेगवान वाहतूक व्यवस्थेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला पालघर जिल्ह्यातील तारापूर परिसरात स्थानिक ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या वनई, साखरे, हनुमान नगर, शिगाव आणि चंद्रानगर या गावांमधील सुमारे 25 शेतकऱ्यांना अद्याप जमीन, झाडे आणि घरांचा योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुलेट ट्रेनचे काम थेट बंद पाडले असून, गेल्या दोन दिवसांपासून प्रकल्पाचे काम पूर्णपणे ठप्प आहे.
advertisement
अद्याप मोबदला मिळाला नाही
हनुमान नगर, चंद्रानगर आणि शिगाव या गावांतील जवळपास पाच ते सहा एकर जमीन बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. मात्र, भूसंपादन प्रक्रियेला बराच काळ उलटूनही अनेक शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर काम सुरू करण्यात आले, तर काहींच्या घरांजवळील झाडे आणि संरचना काढून टाकण्यात आल्या, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मोबदला न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
“आमची जमीन, झाडे आणि उपजीविकेचे साधन या प्रकल्पासाठी घेतले, पण बदल्यात आम्हाला काहीच मिळाले नाही,” असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही ठोस उत्तर मिळत नसल्याने शेवटी काम बंद पाडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जोपर्यंत संपूर्ण मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प काय आहे?
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील पहिला हाय-स्पीड रेल प्रकल्प असून, तो जपानच्या शिंकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 508 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात येत असून, त्यापैकी सुमारे 155 किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातून जाणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, बोईसर आणि गुजरातमधील प्रमुख शहरांना जोडणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास अवघ्या दोन ते अडीच तासांत पूर्ण होणार आहे.
या बुलेट ट्रेनचा वेग सुमारे 320 किलोमीटर प्रतितास इतका असणार असून, प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
