हिंदू संस्कृतीमध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपवास म्हणजे अन्नपाणी आणि सर्व भोग वर्ज्य करून राहणे. परंतु, सर्वसाधारणपणे उपवासाचा अर्थ हलका व कमी आहार घेणे, असा गृहित धरला जातो. उपनिषदकालीही जाणत्या लोकांना उपवासाचे महत्त्व माहीत झाले होते. वेदवचनाचा आधार घेऊन यज्ञ, दान, तप आणि उपवास हे परमेश्वरप्राप्तीचे चार मार्ग, असे सांगितले गेले आहे. तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास हा मुख्य व श्रेष्ठ आहे असे महाभारतात सांगितले आहे. व्युत्पत्तीदृष्ट्या उपवास शब्द उप + वस् म्हणजे जवळ बसणे असा आहे. देवाच्या, गुरूच्या, सत्पुरुषांच्या सान्निध्यात बसणे असाही अर्थ समजला जातो.
advertisement
धार्मिकदृष्ट्या पापक्षालनासाठी, ईश्वरप्राप्तीसाठी , पुण्यप्राप्तीसाठी आणि प्रायश्चित म्हणून उपवासाचे व्रत केले जाते. परंतु आधुनिक काळात सांगायचे तर शरीराच्या आरोग्यासाठीही उपवासाची आवश्यकता आहे. आधुनिक भाषेत आपण उपवासाला डाएटिंग असेही म्हणू शकतो. हलका आहार घेतला तर शरीरातील मांद्य कमी होण्यास मदत होते. शरीर हलके राहिल्याने चपळता येते. आपली कार्यक्षमता वाढते. वजनावर नियंत्रण राहण्यास मदत होते. उपवास करण्याचा आणखी फायदा म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याची संवय आपणास लागते. हलका आहार घेणे हा उपवासाचा मूळ उद्देश आहे. हलका आहार घेतल्याने आपल्या शरीरातील मांद्य कमी होते, आळस आणि निद्रा न आल्याने उपासनेकडे आपले लक्ष एकाग्र करणे सुलभ होते. मन सात्विक व जागृत राहते. नवरात्रात देवीच्या उपासनेत याचा उपयोग होतो.
आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे?
उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याबद्दल मतभिन्नता आहे. कोणत्याही धार्मिक मान्यवर ग्रंथात याविषयी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही. तांदूळ सोडून हविष्य अन्न उपवासाला खाण्यास हरकत नाही असे सांगण्यात आले आहे.
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; जुलै महिना जबरदस्त लाभ देणार
हविष्य म्हणजे हेमंत ऋतूत झालेली. अग्नीस आहुती देण्यायोग्य अन्नधान्ये, मूग, यव, तीळ, वाटाणे, मटार, देवभात, नारळ, चंदनबटवा, चाकवत, मुळा, सेंदोलोण, गाईच्या दुधाचे दही व तूप, लोणी न काढलेले दूध, फणस, आंबा, हरीतकी, पिंपळी, जिरे, नागरंग, चिंच, केळे, आवळा, गूळ सोडून ऊसाचे इतर पदार्थ, हे सर्व पदार्थ तेलात तळलेले असता कामा नये. अन्न ही संज्ञा भातालाच आहे. शास्त्रीयदृष्ट्या सांगायचे म्हणजे उपवासाला अन्न हे पूर्ण वर्ज्य आहे. उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा खीर चालते, असे कुठल्याही महत्त्वाच्या ग्रंथात लिहिलेलं नाही. खरं म्हणजे साबुदाणा आरोग्यास खूप अपायकारक असतो. बटाटे हे सुद्धा मूळ भारतीय नाहीत. भगर ही आरोग्यास चांगली आहे. ती उपवासाला खायला हरकत नाही. फळे , दूध वगैरे हलका आहार उपवासास घ्यायला हरकत नाही.