या प्रकरणाची सुरुवात शिक्षिकेच्या मोबाईलवर सातत्याने येणाऱ्या संदेशांमुळे झाली. हृदयाच्या इमोजींसह तुम्ही मला खूप आवडता, तुम्ही दुसऱ्यांशी बोललेले मला चालत नाही, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही अशा आशयाचे संदेश विद्यार्थिनी पाठवत होती. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही संदेशांचा ओघ थांबला नाही. समजावून सांगूनही विद्यार्थिनी ऐकत नसल्याने शिक्षिकेने अखेर शाळा प्रशासनाला माहिती दिली. चौकशीत विद्यार्थिनीने हातावर ब्लेडने शिक्षिकेचे नाव कोरल्याचे आणि आत्महत्येची धमकी दिल्याचे उघड झाले.
advertisement
VIP असल्याचा बनाव, तुळजाभवानी मंदिरात गंडला डाव, तुळजापुरात खळबळ, पाहा काय झालं?
प्रकरण याठिकाणीच थांबले नाही. काही दिवसांपूर्वी संबंधित विद्यार्थिनीने तिच्याच वर्गातील एका मुलीला वॉशरूममध्ये गाठून तू खूप सुंदर दिसतेस, तुला बॉयफ्रेंड आहे का? अशी विचारणा केल्याची तक्रार करण्यात आली. घाबरलेल्या विद्यार्थिनीने उपमुख्याध्यापिकांकडे धाव घेतली. चौकशीत नववीतील चार ते पाच मुलींनाही तिने आय लव्ह यूचे संदेश पाठवले होते, त्यांच्या हातात अंगठी घालण्याचा प्रयत्न केला होता. वर्गात न बसता शाळेत फिरणे आणि शिक्षिकेकडे एकटक पाहणे हे तिचे रोजचेच वर्तन बनले होते.
घडामोडी गंभीर असल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने दामिनी मार्शल यांच्याशी संपर्क साधला. पोलिसी कारवाईऐवजी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समुपदेशनाचा मार्ग निवडण्यात आला. विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्यात आले. चौकशीत तिने कबूल केले की, वयात येताना होणारे हार्मोन्समधील बदल आणि इंटरनेटवरील कंटेंटमुळे तिच्या मनात अशा भावना निर्माण होत होत्या. आकर्षण आणि प्रेमातील फरक न समजल्याने तिचे वर्तन धक्कादायक वळणावर गेले.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निकेत कासार यांनी किशोरवयीन मुलांमध्ये भावनिक गुंतागुंत, नैराश्य, कौटुंबिक पार्श्वभूमी यांचा परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट केले. तर डॉ. विद्याधर बापट यांनी सायक्रोमेट्रीक चाचणी करून पर्सनालिटी डिसऑर्डर, हार्मोनल किंवा मेंदूतील केमिकल असंतुलन आहे का, हे तपासण्याची गरज व्यक्त केली.
सध्या संबंधित विद्यार्थिनीला तात्पुरते शाळेत नियमित येणे थांबवून परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली आहे. अभ्यास, खेळ आणि सकारात्मक उपक्रमांकडे लक्ष वळवण्याचा सल्ला देत मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी नेण्याची शिफारस करण्यात आली आहे. या घटनेमुळे शालेय पातळीवर समुपदेशन, संवाद आणि पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.






