ही घटना पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात कृष्णानगरमधल्या घुरनी भागात घडली आहे. कृष्णानगरच्या हिजुली भागातल्या एका तलावात शनिवारी (26 ऑगस्ट) पोत्यात बांधलेला एक मृतदेह सापडला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही किशोरवयीन आरोपींना अटक करून रविवारी (27 ऑगस्ट) बालन्यायालयात हजर केलं. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुरनी भागात राहणारा, आठव्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी शुक्रवारी (25 ऑगस्ट) दुपारी काही वस्तू खरेदी करण्यासाठी घराजवळच्या दुकानात गेला होता. त्या वेळपासून तो बेपत्ता झाला. शनिवारी सकाळी त्याच्या आईला अपहरणकर्त्यांचा कॉल आला. त्यांनी तीन लाख रुपये खंडणी मागितली होती. त्यानंतर मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली.
advertisement
पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं, की त्यांनी तीन किशोरवयीन आरोपींना अटक केली आहे. ते तिन्ही आरोपी मृत मुलाच्याच शाळेत दहावीत शिकत होते. त्यांनी त्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह तलावात फेकून दिल्याचं कबूल केलं आहे.
त्या मुलाच्या आईकडून तीन लाख रुपये खंडणी मिळाल्यावर त्यांना त्या पैशांतून कम्प्युटर खरेदी करायचा होता. त्यांना त्यावर गेम्स खेळायचे होते. हे पैसे मिळवण्यासाठीच त्यांनी त्या मुलाच्या अपहरणाचा प्लॅन आखला; मात्र त्या मुलाची आई खंडणीची रक्कम देण्यास असमर्थ ठरेल, असं वाटून त्यांनी त्या मुलाला मारून टाकलं असावं, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मुलाला जिवंत सोडून दिलं, तर पोलीस आपल्याला पकडतील, अशी भीती त्यांना वाटली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, त्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मृत मुलाच्या वडिलांचं बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झालं असून, त्याची आई आया म्हणून काम करते. दरम्यान, या घटनेतली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी मुलाला ठार करण्याआधी त्याची अखेरची इच्छा विचारली. त्याने रसगुल्ला खाण्याची आणि कोल्ड-ड्रिंक पिण्याची इच्छा व्यक्त केली. ती त्या आरोपींनी पूर्ण केली आणि त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याला ठार केलं.