रणबीर कपूर सोबतच अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी हे कलाकार झळकत असताना त्यांच्यासोबत काही मराठी कलाकारांनी देखील लक्ष वेधलं आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेचा जबरदस्त केमिओ आहे. या भूमिकेमुळे हिंदी प्रेक्षकही उपेंद्रच्या अभिनयाचे चाहते झाले आहेत.
चित्रपटात एका महत्वाच्या फायटिंग सीन दरम्यान उपेंद्र लिमयेची एंट्री होते. त्यानंतर त्याचे मराठीतही डायलॉग आहेत. त्याच्या या संवादांवर चित्रपटगृहात टाळ्या आणि शिट्या पडल्या. उपेंद्र लिमयेच्या दमदार अभिनयाने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. या भूमिकेला मिळालेलं यश पाहून उपेंद्र लिमये भारावला असला तरी त्याने एक खंत मात्र व्यक्त केली आहे.
advertisement
नुकतंच 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमये चित्रपटाला येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांविषयी म्हणाला, 'एखाद्या चित्रपटाने समाज बिघडत नसतो, प्रत्येक चित्रपटाकडे एक कलाकृती म्हणून पाहिलं पाहिजे.'
उपेंद्र लिमयेंचा याआधी मराठीतील जोगवा चित्रपट असाच गाजला होता. यात त्यांची तायप्पा ही भूमिका होती. या जोगवा चित्रपटातील 'तायप्पा' साठी उपेंद्र याना नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्यामुळे फ्रेडी आणि तायप्पाला मिळालेलं हे यश पाहून कसं वाटतं? हा प्रश्न त्याला यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना उपेंद्र म्हणाले, ''फ्रेडीला एवढा प्रतिसाद मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. तीन दिवस मुलाखती सुरू असल्याने माझ्या संपूर्ण घराचा स्टुडिओ झाला होता. नॉर्थ अमेरिकेतील काही डिजिटल प्लॅटफॉर्मकडून माझ्या मुलाखती घेण्यात आल्या. एवढं भयानक यश मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं.''
तायप्पाविषयी बोलताना उपेंद्र म्हणाले, ''हे यश पाहून एक कलाकार म्हणून त्रास होतो. जर एवढं यश त्यावेळी तायप्पाला मिळालं असतं, तर काय मजा आली असती हे शब्दात नाही सांगता येणार…असं एक कलाकार म्हणून मला नक्कीच वाटलं.'' असं मत उपेंद्र लिमयेंनी मांडलं आहे.