भारताच्या पश्चिम सीमेजवळ भारतीय सैन्य, नौदल आणि हवाईदल यांच्या संयुक्त सहभागाने होणाऱ्या दहा दिवसांच्या लष्करी सरावामुळे (Tri-Services Exercise) पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ माजली आहे. या सरावाच्या घोषणेनंतर पाकिस्तानने आपल्या दक्षिण आणि पश्चिम लष्करी तळांना उच्च सतर्कतेवर (High Alert) ठेवले असल्याचे वृत्त CNN-News18 ने दिले आहे.
advertisement
भारताने 30 ऑक्टोबरपासून 10 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोठ्या प्रमाणातील युद्धाभ्यासासाठी NOTAM (Notice to Airmen) जारी केले आहे. हा सराव गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवरील सर क्रीक–सिंध–कराची या अक्षावर म्हणजेच पाकिस्तानच्या ‘डीप साऊथ’ भागात होणार आहे. या भागात होणारा सराव आणि त्याची वेळ यामुळे पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेत अलर्ट आणि भीती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानमधील सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, या सरावामुळे पाकिस्तानने आपल्या Southern Commands (सिंध आणि दक्षिण पंजाब) मध्ये हाय अलर्ट घोषित केली आहे. पाकिस्तानी हवाईदल आणि नौदल यांना पूर्ण तयारीत ठेवण्यात आले असून, कोणत्याही आक्रमक हालचालींना तात्काळ उत्तर देण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेषतः पाकिस्तानच्या बहावलपूर स्ट्राइक कॉर्प्स आणि कराची कॉर्प्स यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर शोर्कोट, बहावलपूर, रहीम यार खान, जेकबाबाद, भोलारी आणि कराची येथील हवाईतळांवर स्टँड-बाय मोडमध्ये पथके ठेवली गेली आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानी नौदलाला अरब सागरात गस्त वाढवण्याचे आणि किनाऱ्यालगतच्या कारवायांवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माहितीनुसार भारताने या सरावासाठी निवडलेला भाग बहावलपूर, रहीम यार खान, थार वाळवंट आणि सर क्रीक परिसर हा अत्यंत रणनीतीदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. या भागात भारत संयुक्त कारवाईद्वारे म्हणजेच नौदल, हवाईदल आणि भूसेनेच्या समन्वयाचा सराव करणार आहे. पाकिस्तानकडून मिळालेल्या माहितीनुसार या सरावामुळे त्यांना असे वाटते की भारत कराची आणि सिंध किनाऱ्यावरील व्यापार आणि ऊर्जा मार्गांवर दबाव आणण्याची क्षमता दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कराची हे पाकिस्तानचे आर्थिक केंद्र असून, देशाच्या सुमारे ७० टक्के व्यापार कराची आणि बिन कासिम बंदरांतून होतो. त्यामुळे हा प्रदेश पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे.
भारताने या सरावाद्वारे पाकिस्तानला एक स्पष्ट संदेश दिला आहे की- भारत कोणत्याही वेळी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर (Multiple Fronts) लष्करी मोहिम उघडण्याची क्षमता ठेवतो. पंजाब किंवा काश्मीरपुरते मर्यादित न राहता भारताने आता दक्षिणेकडील समुद्री आणि स्थलसीमांवर आपली क्षमता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेत मात्र या प्रदेशाला तुलनेने दुर्लक्ष केले गेले असून, सर क्रीक–बादिन–कराची हा भाग सपाट, अल्पसंख्य सैनिकांसह आणि पुरवठ्याच्या दृष्टीने असुरक्षित (logistically exposed) मानला जातो. त्यामुळे या भागात कुठलीही यशस्वी कारवाई झाली, तर ती कराचीला देशाच्या उर्वरित भागापासून तोडू शकते आणि पाकिस्तानच्या समुद्री व्यापार, ऊर्जा पुरवठा आणि आर्थिक हालचालींवर गंभीर परिणाम करू शकते.
या परिस्थितीला आणखी गंभीर बनवणारा घटक म्हणजे पाकिस्तानमधील आतील सुरक्षा ताण. सध्या पाकिस्तानी सेना खैबर–पेशावर पट्ट्यातील दहशतवादी हालचालींमध्ये अडकली आहे. ज्यामुळे तिच्या संसाधनांवर मोठा ताण आहे. अशा वेळी भारताकडून होणारा मोठा सराव पाकिस्तानसाठी आणखी चिंता वाढवणारा ठरत आहे.
भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या मते, मात्र हा सराव पूर्णतः नियमित (Routine) प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग आहे. अशा प्रकारचे NOTAM-आधारित युद्धाभ्यास हे सैन्याची संयुक्त ऑपरेशनल तयारी (Joint Operational Readiness) तपासण्यासाठी केले जातात आणि यामागे कोणताही राजकीय किंवा आक्रमक हेतू नसतो.
सध्या पाकिस्तानचे सर्व दक्षिण लष्करी तळ आणि हवाई दल उच्च सतर्कतेच्या स्थितीत आहेत. दोन्ही देशांकडून सीमेजवळील आणि समुद्र किनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या घटनाक्रमाने हे स्पष्ट केले आहे की मोठ्या प्रमाणातील लष्करी सराव आणि त्यामधून होणारे “स्ट्रॅटेजिक सिग्नलिंग” हे दोन्ही देशांमधील राजकीय आणि सामरिक तणाव वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते, जरी अधिकृत पातळीवर त्यांना “रूटीन ट्रेनिंग” म्हटले जात असले तरी.
