पाटणा: बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सर्वाधिक चर्चा झालेल्या नावांपैकी एक म्हणजे प्रशांत किशोर. ‘पीके’ म्हणून ओळखले जाणारे किशोर, निवडणुकीपूर्वी बिहारच्या राजकारणात अपरिहार्य व्यक्ती बनले होते. देशातील सर्वाधिक चर्चित निवडणूक रणनीतिकार म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी ‘जन सुराज’ ही नवी राजकीय पार्टी स्थापन केली. पक्षाने सुरुवातीला सर्व 243 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती, मात्र नंतर काही उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्यामुळे अखेर पक्षाने 240 जागांवर निवडणूक लढवली. पण मतमोजणीतील सुरुवातीच्या कलांनुसार जन सुराजचा खाता सुद्धा उघडत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मतदारांनी या नव्या राजकीय प्रयोगाला नाकारले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
जरी जन सुराज नवी पार्टी असली तरी बिहारसारख्या गुंतागुंतीच्या राजकीय समीकरण असलेल्या राज्यात मोठ्या पक्षांना आव्हान देणे हे स्वतःतच कठीण काम होते. एग्जिट पोलच्या अंदाजांमध्येही जन सुराजचा प्रभाव फारसा दिसत नव्हता. मात्र प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वी मोठमोठे दावे केले होते. त्यांनी तर असेही म्हटले होते की जन सुराज 140 जागा जिंकला, तरी ते ‘अपयश’ मानतील. जन सुराजचे औपचारिक उद्घाटन जरी वर्षभरापूर्वी झाले असले, तरी पीके मागील तीन वर्षांहून अधिक काळ बिहारभर पदयात्रा करून स्थानिक लोकांशी जोडले गेले होते. त्यामुळे निरीक्षकांच्या नजरा या गोष्टीवर होत्या की जन सुराज एनडीए आणि इंडिया ब्लॉक या दोन्ही यांच्या पारंपरिक समीकरणात बदल घडवू शकतो का.
कोण जिंकणार बिहार? Geminiने हात जोडले, Chatgptचा सांगितला धक्कादायक निकाल
प्रशांत किशोरांचा जादू का चालला नाही?
जन सुराज हा बिहारमध्ये विचारधारा-आधारित (गांधीवादी) आणि मुद्दा-आधारित (दारूबंदीचा विरोध, रोजगार, आरोग्य, शिक्षण) राजकारण रुजवण्याचा प्रयत्न होता. पण बिहारसारख्या जातीय आणि धार्मिक समीकरणांनी भारलेल्या राज्यात हा प्रयोग अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरू शकला नाही.
ग्रामीण भागात मर्यादित पोहोच
बिहारची बहुतांश लोकसंख्या ग्रामीण आहे. पण जन सुराजची ओळख ग्रामीण मतदारांमध्ये अजूनही खूपच कमी होती. अनेकांना पक्षाचा निवडणूक चिन्ह किंवा उमेदवारच माहिती नव्हते. तीन हजार किलोमीटरहून अधिकची पदयात्रा करूनही पारंपरिक पक्षांच्या तुलनेत जनजागृती मर्यादित राहिली.
उमेदवाराच्या विजयाचा जश्न; 1 लाख लोकांसाठी महाभोजन, 2 लाखांपेक्षा जास्त रसगुल्ले
कमकुवत संघटना आणि अंतर्गत नाराजी
जन सुराजने पारंपरिक पक्ष संरचनेऐवजी ‘प्रशांत किशोर’ या ब्रँडवर आणि पेड वर्कर नेटवर्कवर जास्त भर दिला. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. काही संस्थापक कार्यकर्त्यांना तिकीट न देता ‘पॅराशूट’ उमेदवारांना तिकीट देण्यात आल्यामुळे पक्षात मतभेद उफाळून आले. काही मोठी नावे—जसे की माजी IPS आनंद मिश्रा पक्षातून बाहेर पडली, जे संघटनेतील तणावाची स्पष्ट खूण होती.
जातीय राजकारणात प्रवेश करण्यात अपयश
बिहारची निवडणूक जात आणि धर्माच्या मजबूत समीकरणांवर उभी आहे. जन सुराजने मुद्दा-आधारित राजकारणाचा नवा पर्याय देण्याचा प्रयत्न केला पण मतदारांची पारंपरिक जातीय निष्ठा ढळली नाही. विशेषत: मुस्लिम मतदार आणि काही इतर समुदायांनी BJP ला रोखण्यासाठी महागठबंधनलाच प्राधान्य दिले, कारण ते त्यांना ‘सुरक्षित’ पर्याय वाटले. त्यामुळे पीकेची ‘नवी राजकारणाची’ संकल्पना व्यापक प्रमाणात रुजली नाही.
विरोधकांचा दबाव आणि उमेदवारांचे नामांकन मागे
प्रशांत किशोर यांनी BJPवर गंभीर आरोप केले होते की त्यांच्या उमेदवारांना धमकावून किंवा प्रलोभन देऊन नामांकन मागे घ्यायला भाग पाडले. काही उमेदवारांनी खरोखरच स्पर्धेतून माघार घेतली. ज्यामुळे पक्षाची गती कमकुवत झाली आणि जन सुराजला नव्या आव्हानासारखे गांभीर्याने घेतले जात नाही, असा संदेश गेला.
स्वतः निवडणूक लढले नाहीत
पक्षाचा सर्वात मोठा चेहरा असलेले पीके स्वतः निवडणूक लढले नाहीत. हे त्यांच्या वैयक्तिक धोरणाचा भाग असू शकते, पण पारंपरिक राजकारणात मोठ्या नेत्याने निवडणूक न लढणे म्हणजे अनिश्चिततेचा संकेत मानला जातो. त्यामुळे अनेक मतदारांच्या मनात त्यांच्या अंतिम हेतूबद्दल संभ्रम निर्माण झाला असेल.
एकूणच जन सुराजची निवडणूक रणनीती, त्यांचे मुद्दे आणि प्रशांत किशोरांचे नेतृत्व या सर्व गोष्टी असूनही बिहारच्या पारंपरिक राजकीय संरचनेसमोर हा नवा प्रयोग सध्या तरी यशस्वी ठरताना दिसत नाही.
