अपोलो हॉस्पिटल्सच्या अहवालानुसार, 2020 मध्ये कॅन्सर रुग्णांची वार्षिक संख्या सुमारे 14 लाख होती. 2025 पर्यंत त्यात 15.7 लाखांपर्यंत वाढ होईल. कॅन्सरची कारणं दूर करण्यासाठी तसेच प्रभावी प्रतिबंध आणि उपचार लागू करण्यासाठी सर्वसमावेशक सरकारी प्रयत्नांची गरज आहे, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्युट अँड रिसर्च सेंटरमधील (आरजीसीआयआरसी) प्रीव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. इंदू अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात कॅन्सरच्या टाळता येण्याजोग्या कारणांमध्ये तंबाखूचे सेवन सर्वात वर आहे. त्यांनी आयएएनएसला सांगितलं की, सुमारे 26.7 कोटी प्रौढ तंबाखू खातात. तोंड, फुफ्फुस आणि इतर कॅन्सरशी त्याचा थेट संबंध आहे. अनहेल्दी डाएट आणि आरामदायी जीवनशैलीमुळे आतडे, स्तन आणि स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
advertisement
पाण्यात भिजवलेल्या चिया सीड्सचं रिकामी पोटी करा सेवन, शरीरात दिसतील आश्चर्यकारक फायदे
डॉ. अग्रवाल म्हणाल्या, "प्रतिबंध आणि वेळेवर निदान होण्याला खूप महत्त्व आहे. या घटकांकडे लक्ष केंद्रीत करून, आपण कॅन्सर मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो आणि उपचारांचे परिणाम सुधारू शकतो."
वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे कॅन्सर रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. वृद्ध लोक अनेक प्रकारच्या कॅन्सरला बळी पडतात. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही), हिपॅटायटीस बी आणि सी व्हायरच्या संसर्गामुळे अनुक्रमे सर्व्हायकल आणि लिव्हर कॅन्सर होतो. हे कॅन्सर टाळण्यासाठी एचपीव्ही आणि हिपॅटायटीस बी लसीकरणाला प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे संचालक डॉ. प्रथमेश पै यांनी आयएएनएसला सांगितलं की, अलीकडील अर्थसंकल्पात आरोग्यसेवा खर्चात कर कपात करण्यात आली आहे. त्यामध्ये कॅन्सरवरील अत्यावश्यक औषधांचा देखील समावेश आहे. नवीन उपचार अधिक परवडणारे आणि सोपे व्हावेत, हा यामागील उद्देश आहे. पण, आरोग्य सेवा योजनांचा विस्तार आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अधिक काम करणं गरजेचं आहे. या समस्येला सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञांनी, जागरूकता, सामुहिक स्क्रीनिंग प्रोग्रॅम आणि कॅन्सर संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वावर भर दिला.