लक्ष्मीनारायण दाता यांनी हरियाणाच्या रेवाडीतून पुण्यापर्यंतचा प्रवास करत या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. 1930 च्या दशकात ते रेवाडीत हातगाडीवर भजी विकत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांशी झालेल्या वादातून त्यांनी गाव सोडले. काही काळ म्यानमार आणि अफगाणिस्तानमध्ये भटकंती केल्यानंतर ते अखेरीस पुण्यात स्थायिक झाले. कॅन्टोन्मेंट भागात हातगाडीवर चिवडा आणि आईस्क्रीम विकत विकत त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.
advertisement
1945 मध्ये भवानी पेठ परिसरात कारखाना आणि दुकान सुरू करून त्यांनी लक्ष्मीनारायण चिवडा या नावाने व्यवसाय अधिक सशक्त केला. प्रारंभी त्यांनी ट्रेडमार्क नोंदवून व्यवसायाला अधिकृत ओळख दिली. सुरुवातीस दररोज फक्त 200 किलो चिवडा बनवला जायचा, पण आज हा उत्पादन 5 टनांच्या पुढे गेला आहे. त्यांच्या चविष्ट चिवड्यामध्ये पोहा, मका, बटाटा, पातळ पोहा अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.
या व्यवसायात आता चौथी पिढी कार्यरत असून, 150 हून अधिक कामगार इथे कार्यरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनच्या साहाय्याने उत्पादनप्रक्रिया अधिक सक्षम करण्यात आली आहे. दर्जेदार साहित्य आणि पारंपरिक चव यांचे संतुलन कायम ठेवत आजही लक्ष्मीनारायण चिवडा पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे.
गुणवत्ता आणि सातत्य कायम ठेवल्यामुळे आजही लोक ही चव आठवणीने शोधतात. आम्ही परंपरा आणि नाव दोन्ही जपण्याचा प्रयत्न करतो, असं प्रशांत दाता सांगतात.