'हिंदवी स्वराज्य साबुदाणा वडा फॅक्टरी' असं या फॅक्टरीचं नाव असून गेल्या 15 वर्षांपासून ती अविरतपणे सुरू आहे. सुधीर शेवाळे यांनी तिचा पाया रचला होता. शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दररोज 100 साबुदाणा वडे तयार करून विकले जायचे. मात्र, चवीतील सातत्य आणि दर्जा यामुळे ग्राहकांची संख्या हळूहळू वाढत गेली. आता या फॅक्टरीत दररोज 1500 ते 2000 वड्यांची निर्मिती आणि विक्री होते. विशेषतः सोमवार, गुरुवार आणि शनिवार या उपवासाच्या दिवशी वड्यांना अधिक मागणी असते.
advertisement
शेवाळे म्हणाले, "साबुदाणा वडे तयार करण्यासाठी सर्वोत्तम फाईन क्वॉलिटीचा साबुदाणा आणि शेंगदाणे वापरले जातात. शिवाय इतर कच्चामालही अतिशय चांगल्या क्वॉलिटीचा असतो. त्यामुळे वडे कुरकुरीत आणि खरपूस होतात. आमचा वडा सहज तोंडात विरघळतो."
सध्या या फॅक्टरीमध्ये 15 ते 20 कामगार कार्यरत आहेत. वडे तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केली जाते. फॅक्टरीमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या साबुदाणा वड्यांची विक्री फक्त फॅक्टरीतूनच केली जाते. त्यांची कोणतीही फ्रँचायझी नाही. त्यामुळे येथे मिळणारी चव इतरत्र मिळत नाही.
या फॅक्टरीतील एक साबुदाणा वडा 35 रुपयांना विकला जातो. चव आणि दर्जा लक्षात घेता, ग्राहकांना ही किंमत देखील कमी वाटते. अनेक वडेप्रेमी या वड्यांचा आस्वाद घेण्यासाठी खास शिवाजीनगरला येतात. पुणेकरांसाठी हिंदवी स्वराज्य ही फक्त एक फॅक्टरी नाही, तर उपवासात आणि उपवासाशिवायही चविष्ट अनुभव देणारी एक खास जागा झाली आहे.