हिवाळ्यात पायाच्या टाचांची काळजी कशी घ्यावी? याबाबत माहिती देताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पायाची निगा राखणे. पाय स्वच्छ ठेवणे. त्यानंतर जर पायाला भेगा पडत असतील तर त्यासाठी युरियायुक्त मॉइश्चरायझर येतात ते लावावे. रात्री झोपताना हे मॉइश्चरायझर जर तुम्ही वापरले तर तुमचे पाय अगदी नरम राहतील. त्याचबरोबर फूट क्रीम असतात ज्यात युरिया आणि ग्लायकोलिक ऍसिड असतं.
advertisement
तसेच आयुर्वेदात यासाठी कोकम म्हणून उपाय सांगितला आहे. किराणा दुकानात कोकमचं बटर मिळतं. ते सुद्धा तुम्ही गरम करून पायाला लावू शकता. तसेच आणखी एक उपाय आयुर्वेदामध्ये सांगितला आहे. ज्यात तिळाचे तेल तुम्ही पायाला लावून मसाज करा. त्यानंतर कास्याच्या वाटीने पायाला 10 मिनिटे मसाज करा, याला पाद्याभंग्य म्हणतात. ही प्रक्रिया आता अनेक क्लिनिकमध्ये देखील उपलब्ध आहेत. त्याठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. यामुळे पाय अगदी नरम राहतील.
यासोबतच नियमित कोमट पाण्याने पाय धुणे. दिवसातून एकदा कोमट पाण्यात पाय 5-10 मिनिटे टाकून ठेवणे, हे देखील करणे गरजेचे आहे. त्यामुळे पायाची त्वचा नरम होते. हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. दिवसभरात 6–7 ग्लास पाणी प्या. आहारात ओमेगा-3, सुका मेवा, अळशी आणि चिया सिड्स, हंगामी फळे घ्या, यामुळे देखील फायदा होऊ शकतो, अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली.





