कोल्हापूर : पावसाळ्यात बऱ्याच जणांना काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होत असते. अशावेळी सर्वात सोपी डिश सर्वांच्या डोक्यात येते ती म्हणजे भजी. मग बटाटा किंवा कांदा भजी बनवली जाते. मात्र याव्यतिरिक्त अजूनही विविध प्रकारच्या भजी सोप्या पद्धतीने बनवता येतात. त्यापैकीच एक म्हणजे ओव्याच्या पानांच्या भजी आहेत. अतिशय पौष्टिक आणि खायलाही तितक्याच रुचकर अशा या भजी असतात. त्या कशा सोप्या पद्धतीने बनवता येतात, याबद्दलच कोल्हापूरच्या एका गृहिणीने सांगितले आहे.
advertisement
कोल्हापूरच्या नीलम बनछोडे यांनी आजवर पाककला, स्लोगन, वक्तृत्व, निबंध, गृहसजावट अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोदवला आहे. त्यामध्ये शेकडो बक्षिसे आणि प्रमाणपत्रेही त्यांनी मिळवली आहेत. कित्येक ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कारही करण्यात आला आहे. बऱ्याचदा पाककृती स्पर्धेमध्ये त्या नवनवीन पाककृती सादर करत असतात. त्यामुळेच ओव्याच्या पानांच्या भजी देखील कशा सोप्या पद्धतीने करता येतील याबद्दल नीलम यांनी माहिती दिली आहे.
'इथं' 35 रुपयांत मिळते पोटभर पुरी भाजी, तरी व्यावसायिकाची कमाई लाखोंची!
काय लागते साहित्य?
ओव्याच्या पानांच्या भजी बनवण्यासाठी सुरुवातीला थोडी कोवळी अशी ओव्याची पाने धुऊन घ्यावीत. त्यासोबतच बेसन पीठ, थोडे तांदळाचे पीठ, खायचा सोडा, मीठ, बारीक ठेचून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, तळणासाठी तेल, आदी घटक लागतात.
काय आहे पाककृती?
खुसखुशीत अशा ओव्याच्या पानांच्या भजी बनवण्यासाठी खालील प्रकारे कृती करावी
1) एका भांड्यामध्ये बेसन पीठ नीट चाळून घ्यावे.
2) त्यामध्ये भजी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचे पीठ घालावे.
3) पुढे चवीपुरते थोडे मीठ, खायचा सोडा घालून घ्यावा
4) यामध्ये हिरवी मिरची टाकताना पूर्णपणे बारीक न ठेवता थोडी जाडसर ठेचावी. जेणेकरून मिरचीमुळे भजीला हिरवट रंग येणार नाही.
5) यानंतर हळूहळू वरून पाणी ओतत पीठ मिसळून घ्यावे.
6) अति घट्ट किंवा अति पातळपणा पिठाला येणार नाही याची काळजी घ्यावी.
7) साधारण पाच मिनिटे पीठ बाजूला ठेवून त्यानंतर ओव्याची पाने पिठात पूर्णपणे बुडवून घ्यावीत.
8) कढईमध्ये तेल पूर्ण तापल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवून भजी तळून घ्याव्यात.
9) तळताना साधारण लालसर रंग आला वर लगेच भजी बाहेर काढाव्यात.
10) या ओव्याच्या पानांची भजी टोमॅटो सॉस, खोबऱ्याची चटणी किंवा दह्यासोबत देखील उत्तम चव देतात.
काय आहेत ओव्याच्या पानांचे फायदे
औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी ओव्याची पाने ही खरंतर शरीरासाठी उत्तमच असतात. ओव्याच्या पानांमुळे सर्दी, खोकला, श्वसनाच्या समस्या पाचन समस्या, दातदुखी, डोकेदुखी, शरीरदुखी, यासारख्या अनेक समस्यांवर आराम मिळतो. हाडांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी ओव्याची पाने मदत करतात. तसेच वजन कमी करण्यासाठी ही ओव्याची पाने उपयुक्त ठरतात.
दरम्यान अनेक गुणकारी फायद्यांमुळे तसेच पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे ओव्याच्या पानांच्या भजी सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात नक्की खाव्यात, असा सल्ला देखील नीलम यांनी दिला आहे.