पण तुम्हाला माहितीय का की हे नाव या एवढ्या मोठ्या चार किलोमिटरच्या रस्त्याला कसं आणि कोणामुळे मिळालं? म्हणजेच मुंबईच्या मुख्य स्टोशनजवळून जाणाऱ्या रस्त्याला ज्या व्यक्तीचं नाव मिळालं ती महान व्यक्ती आहे तरी कोण? ना. म. जोशी या नावाचा उगम मुंबईत नाही तर चक्क पुण्याच्या मातीत दडलाय.
नारायण मल्हार जोशी (ना. म. जोशी) यांचा जन्म 5 जून 1879 रोजी पुण्याच्या जुन्नर मध्ये झाला. त्यांचं शिक्षण पुण्याच्या ऐतिहासिक डेक्कन कॉलेजमध्ये झालं. पुण्यातील वैचारिक वारसा आणि शिस्त घेऊन हा तरुण मुंबईत आला. पण इथे आल्यावर त्यांनी साहेबांची चाकरी करण्याऐवजी मुंबईच्या गलिच्छ वस्त्यांमध्ये आणि गिरणगावातील धूर ओकणाऱ्या चिमण्यांच्या छायेत राहणाऱ्या कष्टकऱ्यांची सेवा करण्याची वाट निवडली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या 'भारत सेवक समाज' (Servants of India Society) या संस्थेचे ते 1009 मध्ये सदस्य बनले.
advertisement
भारतीय कामगार चळवळीचे 'जनक'
ज्या काळात गिरणी कामगारांना दिवसाचे 14-14 तास राबवून घेतलं जायचं आणि त्यांना कोणतीही सुट्टी नसे, अशा अंधकारमय काळात ना. म. जोशी कामगारांची ढाल बनून उभे राहिले. त्यांनी 1920 मध्ये 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' (AITUC) च्या स्थापनेत सिंहाचा वाटा उचलला आणि अनेक वर्षे त्याचे सचिव म्हणून काम पाहिले. 1922 मध्ये त्यांनी 'ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन'ची स्थापना केली.
आज आपण कामाच्या ठिकाणी जे हक्क अनुभवतो, मग तो 'प्रसूती लाभ' असो, 'कामाचे तास' निश्चित असणे असो वा 'साप्ताहिक सुट्टी', या प्रत्येक कायद्याच्या मागे जोशी यांनी केलेल्या संघर्षाचा मोठा वाटा आहे.
मुंबईत आलेल्या कामगारांना केवळ पगार वाढवून देणं पुरेसं नव्हतं, तर त्यांना सन्मानाने जगायला शिकवणं गरजेचं होतं. यासाठी त्यांनी 1911 मध्ये 'सोशल सर्व्हिस लीग' (सामाजिक सेवा संघ) सुरू केली. कामगारांच्या मुलांसाठी शाळा, वाचनालयं, दवाखाने आणि रात्रीचे वर्ग भरवून त्यांनी गिरणगावात शिक्षणाची गंगा आणली. त्यांनी कामगारांच्या सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या आणि करमणुकीची केंद्रं सुरू केली.
ब्रिटीश अधिकारी 'डिलाईल'च्या नावाने ओळखला जाणारा हा रस्ता प्रत्यक्षात कामगारांच्या हक्काचा मार्ग होता. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गिरण्यांमध्ये राबणाऱ्या हजारो कामगारांसाठी ना. म. जोशी हे केवळ नेते नसून एक आधारस्तंभ होते. 1921 ते 1947 या काळात ते मध्यवर्ती कायदेमंडळाचे सदस्यही होते, जिथे त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. त्यांच्या या महान कार्याचा गौरव म्हणून स्वातंत्र्यानंतर या 4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले.
आज हा मार्ग मुंबईच्या वाहतुकीचा कणा आहे कारण:
हा मार्ग मध्य रेल्वेला समांतर धावतो, त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्यास हाच मुख्य पर्यायी रस्ता ठरतो. भायखळ्यापासून सुरू होणारा हा प्रवास पाच प्रमुख स्थानकांना जोडत थेट प्रभादेवीपर्यंत नेतो. आज जरी या रस्त्यावर टोलेजंग कॉर्पोरेट टॉवर्स उभे राहिले असले, तरी या रस्त्याचा आत्मा आजही त्या जुन्या कष्टकऱ्यांच्या संघर्षात सामावलेला आहे.
30 मे 1955 रोजी या महापुरुषाचे निधन झाले. पुण्यात जन्मलेल्या या धुरंधर समाजसुधारकाने मुंबईच्या गिरणगावाचा चेहरामोहरा बदलला. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चिंचपोकळी किंवा लोअर परळला उतरून या रस्त्यावरून जाल, तेव्हा हे नाव केवळ एका रस्त्याचं नसून एका महान क्रांतीचं आहे, हे नक्की आठवा.
