सातारा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी बिबट्यांनी हल्ले केले. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सातारा या ऊसपट्टा असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत या घटना मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. दरम्यान साताऱ्यात बिबट्याता मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिबट्याचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला तो या संदर्भात उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.
advertisement
शेतकरी रविंद्र घोरपडे यांच्या ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. महत्त्वाचे म्हणजे बिबट्याची 18 नखे देखील काढून घेतल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. बिबट्याच्या शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ऊसतोड करताना आढळला बिबट्या
घोरपडे यांच्या शेतात गेल्या चार दिवसांपासून ऊसतोडीचे काम सुरू होते. सकाळी कामगार ऊस तोडत असताना शेताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दाट व निसरड्या भागात त्यांना बिबट्याचा मृतदेह दिसून आला. अचानक समोर आलेल्या या दृश्यामुळे कामगार घाबरून गेले आणि त्यांनी तत्काळ ही माहिती शेतमालकाला दिली. बिबट्या मादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचे चारही पाय पंज्यापासून कापण्यात आले असून सर्व मिळून तब्बल 18 नखे गायब आहेत.मात्र तिच्या मिशा व सर्व दात सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे.
बिबट्याचा मृत्यूने गूढ वाढलं
बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित असा प्रश्न निर्माण झाला आहे?. शिकारीच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला आहे का? पंजे तोडून नखे तस्करी किंवा अंधश्रद्धेच्या हेतूने वापरण्यात आले असावेत का? अशा अनेक प्रश्न या घटनेबावती गुढ निर्माण करत आहेत.. याचा तपास वनक्षेत्रपाल संदीप जोपळे आणि वनविभागाचे कर्मचारी करत आहेत.
बिबट्यांची वाढती संख्या धोकादायक
ग्रामीण भागातील बिबट्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी जिवघेणी ठरत आहे. मुलाना अंगणात खेळणं, शेतकऱ्यांना शेतात काम करणं , वाडीवस्तीवरील मुलांना शाळेत जाणं जिवघेणं ठरत आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने आजीदेखत अंगणातून उचलून नेले, या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला. यानंतर नागरिक आक्रमक झाले असून सरकार बिबट्यांना संरक्षण देतंय मात्र आम्हा शेतकऱ्यांचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित करत सरकारच्या धोरणावर ताशेरे ओढले आहे.
