बाप रे बाप! या तारखेपर्यंत राज्यात बर्फासारखी थंडी पडणार, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : डिसेंबरच्या मध्यातच महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील वातावरण अधिक थंड झाले आहे
मुंबई : डिसेंबरच्या मध्यातच महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील वातावरण अधिक थंड झाले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे आणि रात्री हुडहुडी जाणवत असून ही परिस्थिती थेट नाताळपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशा बदलत्या हवामानात नागरिकांसोबतच शेतकऱ्यांनीही विशेष दक्षता घेणे अत्यंत गरजेचे ठरले आहे, कारण वाढती थंडी पिकांवर थेट परिणाम करू शकते.
advertisement
कोणत्या भागात किती थंडी?
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. अहिल्यानगर, नाशिक, सातारा, पुणे, बारामती, नांदेड, धाराशिव, जळगाव, मालेगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या शहरांमध्ये थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही भागांत तर किमान तापमान 6 ते 8 अंशांपर्यंत खाली गेले आहे. जेऊर येथे 6 अंश, नाशिकमध्ये 8.6 अंश, साताऱ्यात 9.5 अंश, नांदेडमध्ये 9.9 अंश तर नागपूरमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
advertisement
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज आणि रविवारीही थंडी कायम राहील. सोमवारी व मंगळवारी किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे, मात्र गुरुवारपासून पुन्हा तापमान घसरण्यास सुरुवात होईल आणि नाताळपर्यंत हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतातही शीत लहरीचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
पिकांची काय काळजी घ्यावी?
या वाढत्या थंडीचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसू शकतो. गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, द्राक्षे आणि फळबागांवर थंडीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, थंडीच्या काळात सकाळी किंवा उशिरा संध्याकाळी पाणी देणे टाळावे. शक्यतो दुपारच्या वेळेत हलके पाणी द्यावे, जेणेकरून मातीतील थंडीचा प्रभाव कमी होईल.
advertisement
भाजीपाला आणि फळबागांमध्ये थंडीमुळे पानांवर करपणे किंवा झाडांची वाढ खुंटण्याची शक्यता असते. अशा वेळी मल्चिंगचा वापर करणे फायदेशीर ठरते. पेंढा, प्लास्टिक शीट किंवा सेंद्रिय आवरण वापरल्यास जमिनीतील उष्णता टिकून राहते. द्राक्ष बागांमध्ये हलकी फवारणी करून झाडांवरील दव कमी करणे उपयुक्त ठरते.
advertisement
कांदा आणि हरभरा पिकांमध्ये बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक किंवा शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करावी. थंडीमुळे पिकांवर ताण येऊ नये यासाठी संतुलित खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
advertisement
एकूणच, पुढील काही दिवस राज्यात कडाक्याची थंडी कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतीची योग्य नियोजनबद्ध काळजी घेतली, तर संभाव्य नुकसान टाळता येईल आणि उत्पादनावर होणारा परिणाम कमी करता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2025 8:00 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
बाप रे बाप! या तारखेपर्यंत राज्यात बर्फासारखी थंडी पडणार, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?







