मोकळ्या जागेत कुत्र्यांना खाऊ घालणे ठरणार महाग
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार रस्त्यावर, इमारतींच्या परिसरात किंवा इतर मोकळ्या जागांवर भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबत नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना नवीन सूचना पाठवल्या आहेत.
भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहता सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे आदेश दिले होते. या आदेशांच्या आधारे नगरविकास विभागाने नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या हद्दीत भटक्या कुत्र्यांसाठी एक ठराविक जागा निश्चित करावी. या ठरवलेल्या जागेवरच नागरिकांना कुत्र्यांना खायला देण्याची परवानगी असणार आहे.
advertisement
परिपत्रकात महापालिका आणि नगरपालिकांना आणखी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यात भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांचे निर्बीजिकरण करणे, लसीकरण करणे यांचा समावेश आहे. तसेच पकडलेल्या कुत्र्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान किंवा निवाऱ्यांची सोय करणेही त्यांना बंधनकारक असेल.
भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक शहराने एक विशेष हेल्पलाईन क्रमांक तयार करावा असा निर्देशही देण्यात आला आहे. या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, अशी अटही घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
