अहिल्या नगरमधील मढीमधील यात्रा ही हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक मानली जाते. मात्र, काही दिवसांपूर्वीच ग्रामसभेत ठराव करण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी ग्रामसभेला उपस्थित असलेले ग्रामपंचायत अधिकारी अनिल सूर्यभान लवांडे यांना नियमबाह्य ठराव का केला म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारणे दाखवा नोटिसीचे उत्तर 24 तासात देण्याचे आदेश बजावले आहे.
advertisement
मुस्लिम बंदीचा ठराव नियमबाह्य?
मढी येथे सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत केवळ घरकुलांचे विषय घ्या असे आदेश पंचायत समिती प्रशासनाने दिले असतानाही ऐनवेळेसच्या विषयात पुढील महिन्यात होणाऱ्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी करण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. या ठरावाचे मोठे पडसाद उमटले. या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्यासह शिवसेना उपजिल्हा प्रमुख रफिक शेख,माजी सभापती मिर्झा मणियार,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,वैभव दहिफळे,शिवाजी बडे,प्रशांत टिमकरे,बंडूपाटील बोरुडे,चंद्रकांत भापकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हा ठराव करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तर याच पद्धतीची मागणी वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय जनसंसद संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अशोक सब्बन यांनी केली आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. विषयात वादग्रस्त ठराव घेण्यात आला. कोणताही निर्णयात्मक ठराव घ्यायचा असेल तर तो एनवेळेसच्या विषयात घेता येत नसतानाही तो घेण्यात आला. आपण लवांडे यांना नोटीस बजावली आहे. या ग्रामसभेस जे ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचे तसेच ठरावाचे सूचक व अनुमोदक यांचेही जबाब घेण्याचे आदेशही देण्यात आले आहे. लवांडे यांच्या विरोधात कारवाई करावी असा प्रस्ताव आपण जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
भटक्यांची पंढरी...
मढीच्या कानिफनाथ महाराजांची ही यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रा सुरू असते.भटक्यांची पंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या मढीच्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत यावर्षी मुस्लीम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. मार्च महिन्यामध्ये ही यात्रा भरते. यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा असून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून यात्रेकडे पाहिले जाते. मात्र, या ऐक्यालाच तडा जाणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
