राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार हे २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने जात होते. मात्र, लँडिंग करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात एकच शोककळा पसरली. त्यानंतर डीजीसीएने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले. आता, या चौकशीतील प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
advertisement
विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज ही दोन प्रमुख कारणे असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
नेमकं काय घडलं? तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
तांत्रिक बिघाड (Technical Snag): प्राथमिक अहवालानुसार, विमानाने लँडिंगसाठी धावपट्टीच्या दिशेने कूच केली असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. विमानाची नियंत्रण प्रणाली किंवा इंजिनमध्ये शेवटच्या क्षणी उद्भवलेल्या समस्येमुळे विमान अस्थिर झाले होते.
वैमानिकाचा चुकलेला अंदाज (Pilot Error)
अहवालात नमूद केल्यानुसार, बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना वैमानिकाला धावपट्टीचा (Runway) अचूक अंदाज आला नाही. प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक अडचणींमुळे लँडिंगचा 'अँगल' चुकला, ज्यामुळे विमान नियोजित ठिकाणाऐवजी बाजूला आदळले असल्याचे म्हटले जात आहे.
अपघातग्रस्त विमानाचे सारथ्य कॅप्टन सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी पायलट यांच्याकडे होते. कॅप्टन सुमित कपूर हे अनुभवी पायलट होते. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी पायलट म्हणून जबाबदारी पार पाडली. तर, दुसरीकडे शांभवी पाठक यांच्याकडेही पुरेसा अनुभव होता.
लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात अपघात
वैमानिकाने पहिल्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे न उतरल्याने 'गो-अराउंड' (Go-around) घेऊन दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याच दरम्यान विमानावरचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला.
ब्लॅक बॉक्सच्या डेटाची प्रतीक्षा
जरी हा प्राथमिक अहवाल असला, तरी नागरी विमान महासंचालनालय (DGCA) आता ब्लॅक बॉक्समधील संभाषणावर आणि तांत्रिक डेटावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. या बॉक्समधून मिळणाऱ्या माहितीमुळे वैमानिकाने शेवटच्या क्षणी काय संवाद साधला आणि विमानात नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. अंतिम अहवाल येण्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
