राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या करमाळ्यात काढण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात मुस्लिमांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. येत्या दिवाळीत मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन आमदार महोदयांनी केलं होतं. पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात भूमिका घेतल्यानं अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जगतापांना नोटीस पाठवली. मात्र त्यानंतरही जगताप थांबले नाही. संगमनेरमध्ये निघालेल्या हिंदू आक्रोश मोर्चातही त्यांनी मुस्लिमांविरोधात मुक्ताफळं उधळली. संग्राम जगताप यांनी अलिकडच्या काळात केलेल्या या विधानाबाबत शरद पवारांनी नापसंती व्यक्त केलीय.
advertisement
संग्राम जगताप यांचा निषेध
पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीजातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. जातीय सलोखा ठेवा...स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर बोलत असताना जातीवाचक बोलू नका...बोलताना प्रेमाची भाषा वापरा..आपण करत असलेल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, असं शरद पवारांनी म्हटलंय.
हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या
अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर संग्राम जगताप शांत बसले नाहीत. त्यामुळे अजित पवारांनी जगतपांना थेट मुंबईला बोलावून घेतलं. संग्राम जगतापांनी अचानक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या. यामागे जगतापांचा काय हेतू आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. आता अजितदादांच्या भेटीच्या फर्मानानंतर आता संग्राम जगताप आपली प्रखर हिंदुत्वावादी भूमिका कायम ठेवतात की पुन्हा राष्ट्रवादीच्या विचारधारेला जवळ करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.