राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. शिवसेना शिंदे गटाकडून काही नावे चर्चेत होती. मात्र, या सगळ्या नावांवर मात करत ज्योती वाघमारे यांना मुदत संपण्याआधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटातील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. "दोन वर्ष झाली तरी राज्यपालपद दिलं नाही आणि आता राज्यसभेसाठीही विचार केला नाही," अशा शब्दांत अडसूळ यांनी आपली व्यथा मांडली आहे.
advertisement
शाहांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही...
आनंद अडसूळ म्हणाले की, " तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माझी अमित शाहांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी मला निवडणूक न लढवण्याचा आग्रह करण्यात आला होता आणि त्या बदल्यात राज्यपाल पद किंवा तत्सम पदावर नियुक्ती करण्याचे लिखित आश्वासन दिले होते. मात्र, १० राज्यपाल पदे भरली गेली तरी माझं नाव कुठेच आलं नाही. त्यांनी पुढे म्हटले की, मला आश्वासनानंतरही राज्यपालपद नाही दिलं. शेवटी शेवटी मी ऑफर दिली होती की आता मला किमान तुमच्या कोट्यातून राज्यसभा पद तरी द्या. ही काही अवाजवी मागणी नव्हती. मात्र,आमच्या मागणीला प्रत्येक वेळी हो हो केलं जातं. पण प्रत्यक्षात काही होत नाही. हा आमचा अनुभव असून हे काही देणार नाही आणि त्यांनी दिलयं नाही, असेही अडसूळ यांनी सांगितलं.
मुलाचाही विचार केला नाही!
राज्यसभेसाठी डावलल्याबद्दल बोलताना अडसूळ म्हणाले की, "मी ५ वेळा लोकसभेवर निवडून गेलो आहे. त्यामुळे पुन्हा संसदेत जाण्यासाठी इच्छुक होतो. जर मला संधी द्यायची नव्हती, तर किमान माझ्या मुलाचा तरी विचार करायला हवा होता, तो पक्षाचा राष्ट्रीय सचिव असून पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली आहे. त्याला संधी द्यावी असे मी मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले. मी शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा केला, पण आता आपण काहीही बोलणार नसल्याचे अडसूळ यांनी सांगितले.
