गेल्या २५ वर्षांपासून अन्यायग्रस्त लोकांना मी मदत करतो, लोकांसाठी विविध विषयात काम केले आहे. न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा वाढली पाहिजे, न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढला पाहिजे म्हणून मी काम केले. पण राज्यपालांना मी फालतू म्हणालो म्हणून माझी सनद रद्द करण्याचा निर्णय घेतला पण त्यावेळी कोश्यारी हे राज्यपाल नव्हते, असे सरोदे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच जर मी चुकलो असेल तर सामान्य नागरिकांची माफी मागेल, असेही ते म्हणाले.
advertisement
शिवसेनेच्या केसच्या आधी मुद्दाम निर्णय घेतला का?
१२ ऑगस्ट २०२५ रोजी ऑर्डर काढली. ऑर्डर मला आज मिळाली. तेव्हा निर्णय झाला तर मग आज ऑर्डर का हातात दिली? या निर्णयाच्या विरोधात मी बार कौन्सिलमध्ये अपील करणार आहे. मी राजकीय पक्षाचा नाही पण मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केस लढवतो आहे. येत्या १२ तारखेला केस आहे मग आत्ताच हा निर्णय मुद्दाम दिला का? अशी विचारणाही सरोदे यांनी केली.
भाजप कार्यकर्त्याने माझ्याविरोधात तक्रार केली
असा निर्णय होईल अशी कधीच अपेक्षा नव्हती. मला प्रचंड वाईट वाटतंय. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून हा निर्णय देण्यात आला. माझ्या विरोधात तक्रार करणारा राजेश दाभोलकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याचे अनेक भाजप नेत्यांसोबत फोटो आहेत, असे सरोदे म्हणाले.
फालतू हा शब्द शिवी आहे का?
उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालय हा कार्यक्रम घेतला होता तेव्हा आमदार अपात्र याविषयावर बोललो होतो. भगत सिंह कोश्यारी हे फालतू आहेत असं मी म्हणालो मी मान्य करतो. राहुल नार्वेकर यांनी विश्वासघात केला हे सुद्धा मी म्हणालो. पण त्यावेळी कोश्यारी राज्यपाल पदावर नव्हते, असे सरोदे म्हणाले.
न्याय व्यवस्थेत न्यायाधीश भ्रष्टाचारी आहेत असे मी कधीही म्हणालो नाही. मी म्हटले ते मला मान्य आहे पण मी जे बोललो नाही, त्याचा तुम्ही अर्थ काढू नका. मी चार वाक्य म्हणालो मी त्यावर ठाम आहे. कारण ते वास्तव आहे. फालतू हा शब्द शिवी आहे का? राज्यपाल यांचा अपमान झाला तर त्यांनी माझ्यावर केस करावी. मी काळा कोट घालून मुलाखती देऊ शकतो, असेही ते म्हणाले.
