बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर, अजित नवले, वामनराव चटप आदी नेत्यांनी बुधवारी नागपूरमध्ये अत्यंत आक्रमक पद्धतीने शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केले. कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशामुळे त्यांना आंदोलनस्थळी सोडावे लागले. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलनकत्यांशी चर्चा केली. शेतकरी नेत्यांनी सरकारसोबत चर्चेला तयारी दाखवल्यानंतर गुरुवारी बच्चू कडू यांनी मुंबईत पाऊल ठेवले आहे.
advertisement
न्यायालयातील युक्तिवावेळी ते आंदोलन रद्द करत असल्याची घोषणा
‘रेल रोको आंदोलन’ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे उच्च न्यायालयात बच्चू कडू यांचे वकील हरिओम ढगे यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केले. न्यायालयाकडून स्युमोटो दाखल झालेल्या जनहित याचिकेसंदर्भात आज देखील सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून देखील बच्चू कडूंच्या वकिलांनी घेतलेल्या भूमिकेचे आदेश देताना स्वागत केले.
‘रेल रोको आंदोलन’ रद्द
बच्चू कडू यांनी काल चर्चेचा निकाल न लागल्यास ‘रेल रोको’ आंदोलन पुकारण्याचे आवाहन केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याप्रकरणी, आज सुनावणी पार पडताना पोलिसांकडून न्यायालयात हलफनाम्यात नमूद केलंय की, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर बंद रस्त्यांवरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. मात्र, बच्चू कडू यांच्याकडून निकाल न लागल्यास पुन्हा रेल रोकोचे आवाहन केले असल्याचे पोलिसांनी सांगताच उद्याचे आंदोलन रद्द करत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, उद्या पुन्हा ह्या शेतकरी आंदोलनाच्या जनहित याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे.
शेतकरी आत्महत्येवेळी न्यायालयाने सरकारला कडक निर्देश द्यावेत
आम्हाला न्यायालयाचा अवमान करायचा नाही, असे स्पष्ट करतानाच सर्वसामान्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन न्यायालयाने आंदोलनकर्त्यांना जसे निर्देश दिले तसेच निर्देश शेतकरी आत्महत्या होऊ नये, यासाठी त्यांनी सरकारला द्यावेत, अशी अपेक्षाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
