एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केले जात असल्याची तक्रार करण्यात आली. शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या कारणांपैकी हे एक कारण होते. आता महायुतीमध्येही शिवसेनेबाबत तेच चित्र असल्याचे दिसून येते.
अ शिवसेना नेते, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीतील स्वबळ आणि भाजपबाबत चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. या बैठकीत युतीबाबत पक्षातून नाराजीचा सूर दिसून आला. नाशिक विभाग, नागपूर विभाग, अमरावती आणि औरंगाबाद विभागातून शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र लढण्याबाबतची इच्छा व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे भाजपकडूनही शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी करत स्वबळाची तयारी केली जात आहे.
advertisement
भाजप-मित्रपक्षांकडून आम्हाला संपवण्याचे प्रयत्न...
या बैठकीत सहभागी झालेले आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी बैठकीत भाजप-राष्ट्रवादीबाबतही खदखद व्यक्त केली. मित्रपक्षांकडून युती धर्म पाळला जात नसल्याची तक्रार करण्यात आली.आगामी येणाऱ्या निवडणूका लक्षात घेऊनच महायुतीमधील मित्रपक्षांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार करण्यात आली. आम्हाला मतदारसंघात संपवण्याचं काम सुरू असल्याची कैफीयत शिवसेना नेत्यांसमोर पदाधिकाऱ्यांनी मांडली. नंदुरबारमधील शिवसेना आमदाराने तर शिवसेनेचाच माजी जिल्हाप्रमुख भाजपसाठी काम करत असल्याचे सांगत पक्षात असलेल्या झारीतील शुक्राचार्यांकडे नेत्यांचे लक्ष वेधले.
युतीबाबत संभ्रम...
शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून युतीबाबत अद्यापही ठोस भाष्य करण्यात आले नाही. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिराभाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या नगरपालिकांमध्येंही शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम आहे. दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू आहे.
ठाण्यात संजय केळकर, नवी मुंबईतून गणेश नाईक आणि इतर भाजपच्या नेत्यांकडून उघडपणे स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत होत असलेल्या वक्तव्यांमुळे, शिवसेनेकडूनही खबरदारी म्हणून स्वबळाची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुतीतील या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मतभेदाचा फटका महायुतीला बसू शकतो. तर विरोधकांना काही ठिकाणी नक्कीच फायदा होऊ शकतो. हा तिढा तीनही पक्षतील प्रमुख वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याशिवाय सुटणारा नसल्याचा सूरही या बैठकीत उमटला. तिन्ही पक्षात समन्वयासाठी नेमलेल्या नेत्यांच्या बैठकांमधून कुठलाही तोडगा निघणार नाही. मात्र, वरिष्ठांनी यामध्ये तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यात स्वबळाची चाचपणी...
लवकरच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या बैठका होणार आहेत. मात्र त्या विभागातील जिल्ह्यांमध्ये परिस्थिती काही वेगळी नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे मुंबई वगळता इतर जिल्ह्यात युतीबाबत अजूनही मतभेद असून हे मतभेद मिटवताना तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे…