केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रविंद्र चव्हाण यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकत्याच झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर झाली.
मुख्यमंत्री फडणवीस– एकनाथ शिंदे बैठकीत आगामी मनपा निवडणुकीतील धोरणे, संभाव्य महायुती, उमेदवारी, तसेच स्वतंत्र लढण्याच्या पर्यायांवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे कळते. या चर्चेचा सारांश चव्हाण यांनी थेट अमित शहा यांच्याकडे सोपवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
कोणत्या मुद्यांवर शाहांसोबत झाली चर्चा?
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा राज्यात स्वतंत्र लढली तर काय संभाव्य परिणाम होऊ शकतात, महायुती झाली तर कोणत्या महापालिकांमध्ये सत्ता स्थिर राहू शकते, तसेच महायुती न झाल्यास कुठे धोका निर्माण होऊ शकतो, या सर्व गोष्टींचा तपशीलवार आढावा चव्हाण यांनी शहा यांच्यासमोर मांडला.
त्याचबरोबर, कोणत्या मनपांमध्ये भाजप थेट महापौर बसवू शकते आणि महायुती टिकली तर कुठल्या मनपांमध्ये महायुतीचा महापौर संभवतो, याबाबतही सविस्तर आकडेवारी चर्चेत ठेवण्यात आली.
भाजपच्या अंतर्गत बैठका, रणनीती आणि दिल्लीतील अचानक झालेल्या या रात्रीच्या हालचालीमुळे राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये मोठे राजकीय वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
