इतर पक्षांतील उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाची रणनीती यंदाच्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही ठळकपणे दिसून येत आहे. ‘जिंकण्याची क्षमता’ या एकमेव निकषावर भाजपने राज्यातील २९ पैकी किमान १९ महापालिकांमध्ये आयत्यावेळी पक्षात घेतलेल्या ३३० हून अधिक उमेदवारांना थेट उमेदवारी दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यामुळे पक्षातील जुने आणि निष्ठावंत दावेदार डावलले गेले आहेत. अर्ज भरण्याच्या तीन दिवसांनंतरही असंतोषाचे सूर उमटत आहेत.
advertisement
केंद्रात सलग अकरा वर्षे आणि राज्यात अडीच वर्षांचा अपवाद वगळता आठ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने राजकीयदृष्ट्या मजबूत पकड निर्माण केली आहे. या सत्ताबळामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याकडे अनेक नेत्यांचा कल वाढला आहे. मात्र, निवडणुकांच्या तोंडावर इतर पक्षांतील 'जिंकण्याची क्षमता' असणाऱ्या उमेदवारांना पद्धतशीरपणे पक्षात घेण्याची मोहीम भाजपने सुरूच ठेवली आहे.
विदर्भात भाजपची संघटनात्मक ताकद भक्कम असतानाही नागपूरसह चार महापालिकांमध्ये पक्षांतर करून आलेल्या तब्बल २३ उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
अहिल्यानगरमध्ये तर पक्षाने उमेदवारी निश्चितीसाठी स्थापन केलेल्या कोअर समितीला विश्वासात न घेताच अन्य पक्षांतील उमेदवारांना थेट तिकीट दिल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे, तर काही उमेदवारांचा अधिकृत पक्षप्रवेश सोहळाही पूर्ण न करता त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा दावा भाजपमधीलच पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नांदेडमध्ये ६० टक्केहून अधिक उमेदवार काँग्रेसचे...
नांदेड महापालिकेत परिस्थिती अधिकच टोकाला गेल्याचे दिसून आले आहे. एकूण ६७ पैकी तब्बल ४५ जागांवर काँग्रेसमधून आलेल्या उमेदवारांना भाजपने तिकीट दिले आहे. याविरोधात भाजपचे स्थानिक पदाधिकारी दिलीप ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून, पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.
> कोणत्या महापालिकेत किती आयारामांना संधी?
| महापालिकेचे नाव | किती आयारामांना संधी? |
| नांदेड | ४५ |
| जालना | ३० |
| सोलापूर | ३० |
| नवी मुंबई | २८ |
| पुणे | २५ |
| पिंपरी-चिंचवड | २५ |
| नाशिक | २४ |
| लातूर | १७ |
| छत्रपती संभाजीनगर | १६ |
| मुंबई | १५ |
| धुळे | १२ |
| अहिल्यानगर | १२ |
