जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली.
'इथले दोन-चार कंत्राटदार होते. इथला एक पंचायत समितीचा अध्यक्ष होता. त्यांनी इथलं हे गणित माजी आमदार तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला होता. त्यांना सांगितलं की, वडार नावाच्या अभियंताने आत्महत्या केली. तर त्यांनी सांगितलं की गोपीचंद पडळकर यांचं नाव घ्या. मला घेता येणार नाही. मी त्याच्या पुढची फिल्डिंग लावतो, असं जयंत पाटील म्हणाले होते. बरं विषय काय आहे, राजारामच्या पोराला हे कळलं पाहिजे, ३५ वर्ष आमदार आहे, एका ज्युनियर अभियंताचं आमदाराकडे काम काय असतं. एवढी जर अक्कल नसेल तर हा बिनडोक माणूस आहे. महाराष्ट्र कसा चालवला या माणसाने. हा वारंवार सिद्ध करतोय, बिनडोक माणूस आहे' अशी टीका पडळकरांनी केली.
advertisement
'आमदार फंडाचं पत्र दिलं हे जिल्हा नियोजनला जात असतं. जिल्हा नियोजनकडून पैसे आले तर पत्र हे जिल्हा नियोजनला जातं. जिल्हा परिषदेचं काम असेल तर पंचायत समितीला, सार्वजनिक बांधकामाचं काम असेल तर पीडब्यूला जात असतं. शाखा अभियंता अंदाज पत्र काढत असतो. कंत्राट झाल्यानंतर बिल काढण्याचं काम अभियंत्याचं आहे. पण यांचं काम फक्त गोपीचंद पडळकर यांना बदनाम करण्याचं आहे. गोपीचंद पडळकर असाच तयार झाला आहे का? असे मी लय अटॅक घेऊन इथं आलो आहे. दोन-तीन महिने मी जेलमध्ये जाऊन आलो आहे, अशी टीका पडळकरांनी केली.
एवढंच नाहीतर, आज पण माझ्यावर आरोप केले जातात. जतला माणसं पाठवली. गोपीचंद पडळकरने कुठल्या माणसांकडून वर्गणी घेतली आहे का? हे पैसे घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा असं सांगतात. पण, अरे जयंत पाटला तुझ्यासारखा मी भिकारडा नाही. माझ्यात धमक आहे, जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांची औवलाद वाटतं नाही, काही तर गडबड आहे? अरे जयंत पाटला अशा खालच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.
अजितदादांनी भाजप नेत्यांना करून दिली आठवण
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी याबद्दल विचारले असता त्यांनीही नाराजी व्यक्त केली.
'वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचं एकमेव धोरण आहे, महायुती पक्षामधील तीन पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केलं आहे. त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानसंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं आमचं धोरण आहे. शिवसेने संदर्भात जर काही वादग्रस्त विधान झाले तर एकनाथ शिंदे बोलतील, आमच्या पक्षाकडून जर काही विधान झालं त्याची जबाबदारी माझी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असो तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे, पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळा यापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे म्हणून प्रत्येकाने बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊ नये. असं स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात. त्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट करू नये आणि संविधानाने आणि घटनेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला अधिकार दिला आहे, त्याचा वापर करत असताना समाजामध्ये सलोखा राहील आणि वातावरण चांगले राहील या प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे' असं अजित पवार म्हणाले.