राज्यात मतदारयादीच्या मुद्यांवरून वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. तर, भाजपच्या बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिकच गंभीर आरोप केला आहे. बोगस मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी काही अधिकारी पैसे घेतात, असा आरोप त्यांनी शनिवारी थेट जाहीर कार्यक्रमातून केला.
त्या बेलापूर मतदारसंघातील झोपडीधारकांच्या सर्वेक्षण कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की, “गेल्या तीन निवडणुकांत मी 20 ते 22 हजार बोगस आणि पुनरावृत्त नावांची यादी अधिकाऱ्यांकडे दिली. पण कारवाई होत नाही. तक्रारी जिल्हाधिकारी, निवडणूक विभाग आणि बीएलओंकडे केल्या, तरीही ही नावे मतदार यादीत कायम राहतात.”
advertisement
आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या, “काही अधिकाऱ्यांचा या गैरप्रकारात सहभाग आहे. एवढेच नाही, तर बोगस मतदारांची नावे टाकण्यासाठी पैशांची देवाणघेवाण होत असल्याचाही ठोस अनुभव आला आहे. या कारवायांमुळे प्रामाणिक उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले.
मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या आरोपामुळे निवडणूक प्रक्रियेवर आणि प्रशासनावर थेट अविश्वास निर्माण होण्याची भीती आहे. त्यांनी अधिकाऱ्यांच्या सहभागाचा ठोस उल्लेख केल्याने आता मतदारयादीतील घोळ जाणीवपूर्वक आहे का, याचीही चर्चा रंगण्याची भीती आहे. आपल्या आरोपात त्यांनी मतदारयाद्यांतील भ्रष्टाचार आणि पैशांच्या व्यवहारावर उघडपणे बोट ठेवले.
या आरोपांमुळे बेलापूरसह राज्यातील राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रशासनाकडून आणि भाजपकडून या प्रकरणावर कोणती प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.