गेल्या 20 दिवसांपासून गायब असणारे दोघे अखेर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाले आणि तेथेच तरुणीने प्रियकराविरोधात तक्रार दिल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयिताचे नाव गिरजाराम बबन पवार (वय 27, रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज एमआयडीसी परिसर) असे आहे.
तक्रारदार तरुणी मूळची फुलंब्री तालुक्यातील रहिवासी असून, सध्या ती पतीसोबत वाळूज एमआयडीसी परिसरातील कमळापूर फाटा भागात राहत होती. तिचा पती खासगी कंपनीत काम करतो, तर ती देखील कामानिमित्त कंपनीत ये-जा करत होती. तक्रारीनुसार, गिरजाराम आणि तरुणी यांची सुमारे एका वर्षापासून ओळख होती. दोघे एकाच कंपनीत काम करत होते, शिवाय घराजवळच राहत असल्याने ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर जवळकीत झाले. काही काळापूर्वी तरुणीने ती कंपनी सोडली होती आणि नव्या कामाच्या शोधात होती.
advertisement
सूनेनं स्वत:ची नस कापून घेतली, पाहताच सासूचा झटक्यानं मृत्यू; छ. संभाजीनगरात खळबळ
2 जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास, काम शोधण्यासाठी जात असताना गिरजाराम तिच्या भेटीला आला. त्याने, “तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन”, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या धमकीमुळे घाबरून गेलेली तरुणी त्याच्यासोबत गेली. दोघे बसस्थानकावरून तुळजापूरला गेले.
तुळजापूरमध्ये देवीच्या मंदिराजवळ भाड्याने खोली घेऊन 11 जानेवारीपर्यंत तेथे राहिले. या काळात भीतीमुळे आणि धमक्यांमुळे तिने कोणाचीही मदत घेतली नाही, असा दावा तिने केला आहे. दरम्यान एका दिवशी गिरजारामच्या मोबाइलवरून तिने वडिलांना फोन केला होता. मात्र हा फोन गिरजारामने हिसकावून घेत पुन्हा पती आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने नंतर कोणाशीही संपर्क साधला नाही, असे तक्रारीत नमूद आहे.
पुढे तुळजापूरहून ते दोघे अहिल्यानगर, कर्जत येथे गेले. 12 जानेवारी रोजी गिरजारामने तिला खुलताबाद तालुक्यातील कान्होबा वडोद येथे आपल्या बहिणीकडे नेले. तेथेच त्याने तरुणीसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. पुढील दिवशी तो तिला खुलताबाद तालुक्यातीलच दुसऱ्या बहिणीकडे घेऊन गेला.
दरम्यान, पत्नी बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीच्या पतीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत मोबाइल लोकेशन, संपर्कातील व्यक्ती, संभाव्य ठिकाणे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दोघांचा शोध सुरू केला. 20 दिवस उलटून गेले तरी पत्नीचा शोध लागत नसल्याने पती प्रचंड चिंतेत होता.
तपासादरम्यान पोलिसांनी गिरजारामच्या भाऊजीशी संपर्क साधला. पोलिसांना आपणच तरुणीला पळवून नेल्याचे लक्षात आल्याचे समजताच गिरजाराम घाबरला. अखेर तो तरुणीला घेऊन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला. मात्र, पोलीस ठाण्यात येतानाही “मी तुला पळवून नेले असे सांगू नकोस” अशी धमकी दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
पोलिस ठाण्यात पोहोचताच तरुणीने अखेर धैर्य एकवटत गिरजारामविरोधात तक्रार दिली. पतीला जीवे मारण्याची धमकी देत आपले अपहरण करण्यात आले आणि 20 दिवस जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या तक्रारीनंतर गिरजाराम पवार कायद्याच्या कचाट्यात अडकला असून, पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत.






