छत्रपती संभाजीनगर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठूरायाची महापूजा पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पुरुषांना एक सुखद धक्का दिला, त्यांनी 'लाडका भाऊ योजना' जाहीर केली. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला उत्स्फुर्द प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या योजनेचंही नागरिकांनी स्वागत केलंय. नेमकी काय आहे ही योजना आणि त्यावर काय आहेत तरुणांच्या प्रतिक्रिया, जाणून घेऊया.
advertisement
या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दर महिन्याला 6 हजार रुपये मिळतील. तर, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 8 हजार रुपये मिळतील आणि पदवीधर विद्यार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला 10 हजार रुपये येतील. युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणं हा या योजनेमागचा उद्देश आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच ती व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील असायला हवी.
हेही वाचा : Ladka Bhau Yojana : शिंदे सरकारने लाडक्या भावांसाठी आणली खास योजना, कोल्हापुरातील तरुणाई काय म्हणाली?
यावर किरण बोरडे, आमोल या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांनी म्हटलं की, 'ही योजना आणण्यापेक्षा जर तरुणांना नोकरी दिली तर त्याचा जास्त फायदा होईल. त्यामुळे कोणताही तरुण बेरोजगार राहणार नाही. पैसे देण्यापेक्षा रोजगार देणं गरजेचं आहे. तसंच शाळेपासूनच विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न सरकारनं करावा. परंतु या योजनेमुळे काही फायदा होईल असं मला वाटत नाही', असं एका विद्यार्थ्यानं सांगितलं.
तर, 'असे जर पैसे अकाउंटमध्ये यायला लागले तर तरुण आळशी होतील, त्यांना काम करण्याची इच्छा राहणार नाही. त्यामुळे पैसे देण्यापेक्षा नोकरी द्यावी', असं मतही मांडण्यात आलं. काही तरुणांनी मात्र या योजनेचं स्वागत केलं. 'योजनेमुळे तरुणांचा फायदाच होईल', असं ते म्हणाले.





