छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत हा गौप्यस्फोट केला आहे. एकच व्यक्ती अशाप्रकारे दोन वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवत असल्याने त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशारप्रकारे निवडणूक लढता येते का? याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं द्यावं, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
इम्तियाज जलील पोस्टमध्ये नक्की काय म्हणाले?
एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टमध्ये जलील म्हणाले की, एकच उमेदवार एकाच महानगरपालिकेतील दोन पक्षांकडून दोन वेगवेगळ्या प्रभागांमधून निवडणूक लढवू शकतो का? असा प्रकार छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेत दिसून आला आहे. येथील एक उमेदवार एका वॉर्डमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे. तर दुसऱ्या एका वॉर्डमधून वंचितकडून निवडणूक लढवत आहे. याबद्दल निवडणूक आयोग काही स्पष्टीकरण देऊ शकतं का? असा सवाल जलील यांनी विचारला आहे. जलील यांच्या या पोस्टनंतर आता हा उमेदवार नक्की कोण? असा सवाल उपस्थित झाला असून संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
नियम सांगतो काय?
अर्थात दोन भिन्न मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि बडोदा येथून तर राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे हाच नियम महानगरापालिकेत लागू असल्याचे मानले जात आहे. एक उमेदवार दोन भिन्न मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. तसेच दोन भिन्न प्रभागातून हा उमेदवार निवडणूक लढवत आहे. पण त्याला एकाच प्रभागाचे नेतृत्व करता येईल. कदाचित तो जर दोन्ही प्रभागातून जिंकला तर मात्र मग एका ठिकाणी त्याला राजीनामा द्यावा लागेल. त्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल.
