अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ चारच दिवसांत सुनेत्रा पवार यांनी घाईघाईत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने तसेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही वेगवान पावले टाकली जात असताना विलिनीकरणाची प्रक्रिया काहीशी जटील होऊन बसल्याचे जाणकार सांगतात. शरद पवार यांच्या पक्षाचे नेते विलिनीकरणाबाबत आग्रह धरीत असताना अशी कोणतीच चर्चा आम्हाला अजित पवार यांच्याकडून कळाली नव्हती, असे दावे दादा गटातील नेते करीत आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारल्यावर त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे विधान केले.
advertisement
अपघाताआधी अजित पवार तासभर माझ्याशी बोलले, जर विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असती तर...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र अस्तित्व असलेला पक्ष आहे. त्यांचे निर्णय ते स्वत:घेतात, पण हे खरे आहे की ती आमचे सहकारी पक्ष असल्याने त्यांच्या निर्णयामागे आम्ही त्यांच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. त्यांच्या पक्षात कुणाला पद द्यावे देऊ नये हा त्यांचा मुद्दा आहे, असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, अजित पवार जर एकत्रिकरणाची चर्चा करत होते तर त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती. कोणताही निर्णय घेण्याआधी ते आमच्याशी चर्चा करायचे. आपण असे मानले की त्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती, मग अजित पवार एनडीएमधून किंवा महायुती सरकारमधून बाहेर पडणार होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
व्यक्ती गेल्यानंतर बोलणे बरोबर नाही, नाही तर...
अजित पवार सरकारमध्ये संतुलित (स्टेबल) होते. व्यक्ती गेल्यानंतर बोलणे बरोबर नाही. नाही तर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. पण मला याविषयी राजकारण करायचे नाही, असेही फडणवीस म्हणाले.
अजित दादांबरोबर माझे उत्तम संबंध होते. त्यांच्या माघारी कुणीही खालच्या स्तराचे राजकारण करू नये. आज दोन पक्ष वेगवेगळे झाले आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांचे निर्णय घ्यावेत, हीच आमची भूमिका आहे. सरकारमधील आमचे साथीदार म्हणून त्यांच्या सोबतीला उभे राहणे हे आमचे काम आहे. शपथविधी कधी करावा, त्याच्या अनुषंगाने काय करावे हा त्यांचा मुद्दा आहे. इंदिराजींचा मृत्यू झाला तेव्हा राजीवजींना पंतप्रधान बनविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला होता. मला यात राजकारण करायचे नाही. नाही तर मी बरचं बोलू शकतो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
