काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि उपनेते अमीन पटेल यांनी आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जवळपास ४० ते ५० मिनिटे उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि आगामी राजकीय समीकरणांसंबंधी रणनीतीवर प्रामुख्याने साधक बाधक चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली.
advertisement
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात आली. परिणामी त्यांचे विरोधी पक्षनेतेपदही आपसूकच गेले. त्यांच्या जागी विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसच्या नेत्याला संधी मिळावी, त्यासाठी शिवसेना पक्षाने पाठिंबा द्यावा, अशी विनंती काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना केली. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस पक्षातून सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.
दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देखील रिक्त आहे. या पदासाठी शिवसेना पक्षाने भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून यासंबंधीचे पत्रही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. परंतु सत्ताधारी पक्षातून भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यासंबंधी निर्णय घेत नसल्याचे राजकीय सूत्रे सांगतात. या मुद्द्यावरही काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.
ठाकरे बंधूंचे सूत जुळाल्याने 'मविआ'वर परिणाम
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुमारे दोन दशकानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्र आले. महापालिका निवडणुकांतही राज ठाकरे हे आमच्याबरोबर राहतील, असे संकेत उघडपणे शिवसेनेकडून व्यक्त होत असताना काँग्रेस पक्ष काय करणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच ठाकरे जर आघाडीसोबत राहिले तर राज ठाकरे यांचा काय निर्णय असेल, याबद्दलही उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर उभय नेत्यंमध्ये चर्चा झाली असून काँग्रेस हायकमांडशी चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.