गुजरात राज्याने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत निश्चित केला असून त्यामुळे मासळी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे शाश्वत मासेमारीस चालना मिळत असून हा निर्णय पर्यावरणपूरक आणि मच्छीमारांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्रात सध्या ही बंदी १ जून ते १५ जुलैपर्यंत लागू असते. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत समुद्रात मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि अस्थिर हवामान असते. त्यामुळे नौकांचे नुकसान आणि मच्छीमारांच्या जीवितास धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर, बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी शिष्टमंडळाने मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली. या मागणीला मत्स्यपालन मंत्री नितेश राणे यांनी देखील आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याच पाहायला मिळालं मात्र या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असं नितेश राणे यांनी शिष्टमंडळाला कळवलं.
advertisement
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं की, ही मागणी योग्य असून राज्यातील मच्छीमारांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला जाईल. तसंच, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव सादर करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मच्छीमारांसाठी सुरक्षितता, पर्यावरण संरक्षण आणि मासळी साठा वाढवण्यासाठी हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मच्छीमार समाजानेही या निर्णयाबाबत आशा व्यक्त केली असून त्यांची मागणी लवकरच मान्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.