राज्याचे लक्ष लागलेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आक्रमक भाषण केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी आरक्षणात ओबीसींचा हक्क मारता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. सावरगावच्या भगवान गडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात धनजंय मुंडे यांनी भाषण केले. आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी माझ्या लाडक्या भगिनी पंकजा मुंडे असा उल्लेख केला. आजपर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला सर्वांनी उपस्थिती दाखवत प्रेम दाखवलं त्याबद्दल मी दंडवत घालून नमस्कार करतो. काही दिवसांपूर्वी हा मेळावा होणार नाही, अशी परिस्थिती होती. मात्र, हा दसरा मेळावा घ्यायचा आणि न परंपरा मोडल्याबद्दल पंकजाचे आभार मानत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
advertisement
ओबीसीतून आरक्षणाचा हट्ट, कोणाचं नुकसान झालं? मुंडेंचा सवाल...
आरक्षणावरून मराठा-ओबीसीमधील काही नेत्यांमध्ये वाद, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. धनंजय मुंडे यांनी म्हटले की, मराठा आरक्षणासाठी आम्हीदेखील प्रयत्न केले. कोणत्याही आरक्षणासाठी मी त्यासोबत उभा राहणारा कार्यकर्ता असल्याचे वक्तव्य केले. काहींना मराठा समाजासाठी ओबीसीमधून आरक्षण घ्यायचा हट्ट आहे. ईडब्लूएस मधील आरक्षणाचा कट ऑफ कमी होता. पण, ओबीसीमधून आरक्षण घेतलेल्या बांधवांची नोकरीची संधी गेली. यातून कोणाचं नुकसान झालं असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. ओबीसींचे आरक्षण काढून दुसऱ्याला देऊ नका.
धनुभाऊंनी सांगितलं आरक्षणाचं गणित...
मी बरेच दिवस बोललो नाही. काहीच न करता मी शिव्या खाल्ल्या आहेत. विद्यार्थी चळवळीपासून ज्या ज्या जातींचा आरक्षणाचा मुद्दा आला. त्यांच्या बाजूने मी भांडलो. हे कोणापासूनही लपलं नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलंय, याचा आनंद आहे. आम्ही त्या मराठा आरक्षण चळवळीत आम्ही होतो. पण काही जणांना मराठा आरक्षणाच्या आडून ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं आहे. धनजंय मुंडे यांनी पुढे म्हटले की, एक उदाहरण सांगतो. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. या निकालामध्ये ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ हा 485 गुणांचा होता. तर, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गचा (EWS) कट ऑफ 450 गुणांचा होता . जर मराठा समाजातील उमेदवाराने EWS मधून परीक्षा दिली असती तर 450 गुणांवर उत्तीर्ण झाले असते. आता मात्र, ओबीसींचे आरक्षण घेऊन संधी मिळणार नाही. हे कोणाला फसवत आहेत. काही ठाराविक लोकांना फक्त स्वत: ला खुर्ची मिळावे यासाठी हट्ट सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नोकरी-शिक्षणासाठी सरकारला जेवढं शक्य होतं तेवढं दिलं अजूनही देत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर आमचं काहीही म्हणणं नाही. पण आता मात्र, ह्याच्या ताटातून काढून त्या ताटात देऊ नये असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
मी फक्त आमदार, बहीण मंत्री...
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पूरग्रस्तांच्या शेतकऱ्यांच्या मदतीवरही भाष्य केले.त्यांनी म्हटले की, आज या ठिकाणी शेतकरी आले आहेत, शेत मजूरही आले आहेत. मी आज मंत्री नाही, फक्त आमदार आहे. पण, माझी बहीण मंत्री आहे आणि ती शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारकडून मोठी मदत आणेल, असा विश्वास मला आहे. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतरही पंकजाताईने या ऐतिहासिक दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवली याबद्दल पंकजाताई आणि प्रीतमचे कौतुक करतो.