धाराशिव: धाराशिव जिल्हा भीषण पुराच्या संकटाशी झुंज देत असताना दुसरीकडे शासकीय अधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त असल्याचे समोर आले आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अधिकाऱ्यांची संवेदनशीलता कुठं गेला असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
advertisement
तुळजापुरात शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जात असताना आणि लाखो हेक्टरवरील शेती धोक्यात असतानाच जिल्ह्याचे महसूल अधिकारी नाचगाण्यात रमल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
हा व्हिडीओ, 24 सप्टेंबर रोजीचा असल्याची माहिती आहे. तुळजापूरात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आरडीसी शोभा जाधव यांनी स्टेजवर डान्स केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पूरग्रस्त जनतेच्या भावनांशी थट्टा केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
जिल्हाभरातील शेतकरी संकटात असताना प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असे बेजबाबदार वर्तन योग्य नसल्याची टीका होत आहे. “शेतकऱ्यांना आधार देण्याची वेळ आली आहे, पण जिल्हाधिकारी मात्र डान्स करत आहेत,” असा संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, साडेआठ कोटी रुपये खर्च करून नवरात्र महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी यापूर्वीच केला होता. पूरग्रस्तांना मदतीची गरज असताना इतका खर्च उधळण्यात येत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
खासदार ओमराजे निंबाळकरांनी टोचले कान....
व्हिडीओ प्रकरणावर बोलताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील नागरिक पुराशी झुंज देत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवणे गरजचे असल्याचे त्यांनी म्हटले.
'न्यूज 18 लोकमत' सोबत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, हा तुळजापूर येथील सांस्कृतिक महोत्सव होता. मात्र, पूराच्या काळात हा महोत्सव रद्द करून निधी मदतीसाठी वापरावा, असे आवाहन त्यांनी केले. व्हिडीओत समोर आलेला प्रकार दुर्देवी आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी पूराच्या वेळी पहाटेच्या 4 वाजण्याच्या सुमारास फोन घेतला, हे विसरून चालणार नसल्याचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी सांगितले. या महापूरानंतर शेतकरी संकटात आहेत, त्यांचा विचार झाला पाहिजे. पुराने शेतकऱ्यांचे सगळंच हिरावून घेतलं आहे. कर्ज आणि इतर चिंतांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं, अधिकाऱ्यांनी देखील संवेदनशीलता दाखवायला हवी, असे खासदार ओमराजे निंबाळकरांनी म्हटले.