धाराशिव : इयत्ता चौथीत असताना दृष्टी गेली, तरी हार मानली नाही दहावीपर्यंतचं शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. मग परंपरागत व्यवसायाला हातभार लावला. पुढे पुण्यात नोकरी करायचं ठरवलं. मात्र दृष्टी नसल्यानं कोणी काम द्यायला तयार नव्हतं. मग पुन्हा गावाकडे येऊन नव्या जोमानं आपल्या पारंपरिक व्यवसायाची सुरूवात केली. ही कहाणी आहे सोमनाथ लोखंडे यांची.
advertisement
लहानपणी तेही सर्वसामान्य आयुष्य जगत होते. मात्र डोळ्याला दुखापत झाली आणि दृष्टी गेली. आपण आपल्या एकाही अवयवाशिवाय जगण्याचा विचार करू शकत नाही. त्यात डोळे हा सर्वात नाजूक आणि महत्त्वाचा भाग. जो गमावल्यावर सोमनाथ यांनी शाळा सोडली नाही. तर दहावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.
सोमनाथ लोखंडे हे धाराशिवच्या भूम शहरातील रहिवासी. पुण्यात नोकरी मिळत नव्हती म्हणून जेव्हा हतबल होऊन ते घरी परतले तेव्हा त्यांनी बँकेचं कर्ज काढून 5 लाख रुपयांची गुंतवणूक करून आपला परंपरागत ड्राय क्लिनिंगचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. त्यांनी मोठी गुंतवणूक केली होती, त्यामुळे तशीच मेहनत करण्याचीही त्यांची तयारी होती. अखेर त्यांची मेहनत फळास आली.
आज त्यांच्या व्यवसायात वर्षाकाठी उलाढाल आहे तब्बल 6 लाख रुपयांची. ते अत्यंत सार्थपणे आपलं कुटुंब सांभाळतात. त्यांनी केवळ आपल्या अंधत्त्वावरच मात केली नाही. तर घरची हलाखीची परिस्थितीही सुधारली. आज परिसरातील नागरिकांसाठी ते आदर्श ठरले आहेत.