अनेक शेतकऱ्यांना दिवाळी असतानाही सरकारी मदत मिळाली नाही. जालना जिल्ह्यातील पाहेगाव येथील सुरेश चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या शेतातील तब्बल 700 मोसंबीच्या झाडावर जेसीबी फिरवला आहे. मोसंबीला मिळत असलेला अत्यल्प दर आणि मोसंबी पिकामध्ये फळगळी चे प्रमाण वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
इतर शेतकऱ्यांचे पाहून मी पाच वर्षांपूर्वी तीन एकर शेतामध्ये 15 X 15 अंतरावर 700 मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती. या झाडांना मागील वर्षी तब्बल दीड लाख रुपयांचे शेणखत टाकलं. तसेच दरवर्षी 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च खत औषधांवर केला. आतापर्यंत या मोसंबी बागेवर साडेतीन ते चार लाख रुपयांचा खर्च झालाय.
advertisement
परंतु मागील वर्षी केवळ 30 हजार रुपये एवढं उत्पन्न मिळालं तर यावर्षी 40 हजार रुपये एवढं उत्पन्न मिळालं. मागील पाच वर्षांमध्ये चार लाख रुपये खर्च झाला असून केवळ 70 हजारांचे उत्पन्न हातात आलंय. उत्पन्नामधून खर्च देखील वसूल न झाल्याने झाडावर जेसीबी चालवल्याशिवाय पर्याय उरला नाही. सरकारने मदतीची घोषणा केली पण ती आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. आता दिवाळी कशी करायची असा प्रश्न आमच्या समोर आहे. अशी संतप्त भावना शेतकरी सुरेश चव्हाण यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली.